अरूणा प्रकल्पग्रस्ताचा अखेर मृत्यू 

Aruna project victim finally dies Sindhudurg Marathi News
Aruna project victim finally dies Sindhudurg Marathi News

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - योग्य पुनर्वसन न झाल्यामुळे विष प्राशन केलेल्या शांताराम विठ्ठल नागप (वय 60) या प्रकल्पग्रस्तांचा काल (ता. 13) रात्री उशिरा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यु झाला. गेले सात दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. या प्रकारामुळे अरूणा प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या अधिकाऱ्यांमुळे हा प्रकार घडला आहे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांचे नेते तानाजी कांबळे यांनी केली आहे. 

अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पध्दतीने झालेले नाही. त्यापैकीच आखवणे नागपवाडी येथील शांताराम विठ्ठल नागप या प्रकल्पग्रस्तांचे राहते घर प्रकल्पात गेले. याशिवाय जमीन, झाडे, सर्व बुडीत क्षेत्रात गेले. त्यानंतर प्रकल्पाची घळभरणी झाल्यामुळे त्यांना राहण्यासाठी उंबर्डे-कुंभारवाडी येथे शेड देण्यात आली; परंतु भुखंडाची ताबा पावती न दिल्यामुळे विज वितरण शेडमध्ये वीज जोडणी दिली नाही. घर जमीन, झाडांचे मुल्यांकन योग्य पध्दतीने झाले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्‍याचे वातावरण होते. 

दरम्यान, श्री. नागप यांनी 6 जानेवारीला सायंकाळी 7 वाजण्यच्या सुमारास विष पिवून आत्महत्योचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचाराकरिता सुरूवातीला कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबईला हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना काल रात्री उशिरा त्यांचा मृत्यु झाला. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

""अरूणा प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यांचे योग्य योग्य पुनर्वसन करावे. यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत तहसिल कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत वेळोवेळी आंदोलने केली; परंतु तरीदेखील न्याय मिळाला नाही. पुनर्वसन न झाल्यामुळेच शांताराम नागप यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. ज्या अधिकाऱ्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात मी राज्यमंत्री बच्चु कडु यांची भेट घेणार आहे.'' 
- तानाजी कांबळे, प्रकल्पग्रस्त नेते 

 

आधी धरण मग मरण 
पुनर्वसन गावठणात 23 पायाभुत सुविधा निर्माण करण्यापुर्वीच अरूणा प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली. त्यामुळे काही प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्यात बुडाली. या प्रकल्पाची घळभरणी पुनर्वसन झाल्याशिवाय करू नये अशी सतत मागणी प्रकल्पग्रस्त करीत होते. अनेकदा प्रकल्पग्रस्तांनी आधी मरण मग धरण अशी भुमिका घेतली होती तरीदेखील प्रशासनाने धरणाची घळभरणी केली. त्याचाच परिणाम आता प्रकल्पग्रस्तांच्या मृत्युत झाला आहे. त्यामुळे आधी धरण मग मरण अशीच काहीशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com