खासगी बसमधून कोकणी मेवा नेण्यास बंदी

Ban On Transport Of Konkani Meva From Private Bus
Ban On Transport Of Konkani Meva From Private Bus

कणकवली ( सिंधुदुर्ग ) : पुणे - मुंबईकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात कोकणी मेवा बाजारपेठेकडे वाहतूक केला जात असे, आता मात्र प्रादेशिक परिवहन विभागाने सुरक्षिततेच्या कारणास्तव खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहनातून शेतीमाल वाहतूक करण्यास राज्यभरात बंदी आणली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू असली तरी याचे कडक पालन करण्याचे संकेत आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे कोकणातल्या जांभूळ, करवंद आणि हापूस आंबा विक्रीवर काही प्रमाणात परिणाम होणार आहे.

पुणे- मुंबईसारख्या शहरांमध्ये कोकणी मेळाव्याला मोठी मागणी असते. विशेषतः हंगामाच्या काळात कोकणातील जांभूळ आणि करवंद मोठ्या प्रमाणात मुंबईकडे जात असते. यासाठी खासगी ट्रॅव्हल बसचा वापर केला जात असे. काही प्रमाणात भाज्याही मुंबईकडे खाजगी बसमधून नेल्या जात असत. विक्रीच्या उद्देशाने हा माल कमी-जास्त प्रमाणात खासगी बसच्या टपावरून किंवा डिकीमधून नेला जात असे. मुंबईत मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होती.

सामान्य शेतकरी, बागायतदारांना फटका

विशेषतः कोकणातील उत्पादकांच्या "मालवणी जत्रा', "कोकण महोत्सव' जेथे-जेथे आयोजित केले जातात, अशा मुंबईतल्या शहर आणि उपनगरातील ठिकाणावर हा माल नेण्यासाठी खासगी बस थेटपणे परवडत होती. आता मात्र आरटीओच्या या निर्णयामुळे सामान्य शेतकरी आणि बागायतदारांना फटका बसणार आहे. ट्रक, टेम्पोमधून या शेती मालाची वाहतूक करणे छोट्या शेती उत्पादक शेतकरी संघांना परवडत नाही. महीलांच्या बचतगटांनाही आपला माल ट्रक, टेम्पोमधून वाहतूक परवडत नाही. त्यामुळे अशी मंडळीही खासगी ट्रॅव्हल बसचा उपयोग करत होती. सुरक्षितेचा मुद्दा योग्य असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही बाब अडचणीची ठरणार आहे.

एसटी महामंडळाच्या पार्सल सेवेबाबत नाराजी

शेतकऱ्यांसाठी एसटीची पार्सल सेवा सुरू आहे; पण जिल्ह्यातून देवगड ते बोरीवली याच मार्गावर एसटी बस सेवा सुरू आहे. मालवण ते मुंबई दिवसाची एसटी बसगाडी गेले काही वर्षे सुरू ठेवली आहे; मात्र जिल्ह्याच्या इतर भागातून थेटपणे मुंबईला जाण्यासाठी एसटी बस नाहीत. त्यामुळे पार्सल जिल्ह्यातून मुंबईकडे पाठवण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. त्यातच एसटी महामंडळाच्या पार्सल सेवेबाबत नाराजी आहे. खासगी ठेकेदारी पद्धतीने ही सेवा पुरवली जाते. मात्र एसटीच्या पार्सल विभागात जिथे माल किंवा वस्तू ठेवली जाते. तेथे मोठ्या प्रमाणात चोरी किंवा मालाची नासाडी होते. हा अनुभव जांभुळ आणि हापूस आंबा वाहतुकीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यामुळे खासगीत ट्रॅव्हल बसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा कोकणातील आपल्या नातेवाईकांना मुंबईतील चाकरमान्यांना शेतीमाल पाठवणे थेटपणे सोयीचे ठरत होते. आता या बंदीमुळे बऱ्याच मर्यादा येणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com