रत्नागिरी - काजूची रोपे शेतकऱ्यांनी खरेदी केली नाही, तर ही रोपे जशीच्या तशी रोपवाटिकांमधून पडून राहतील. त्यातून रोपवाटिका मालकांचे नुकसान होईल. ही रोपे शासनाने खरेदी करून शेतकरी, बचत गट अथवा वनविभागाला लागवडीसाठी दिल्यास फायदा होईल, अशी मागणी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने काजू लागवड मोठ्याप्रमाणावर केली जाते. त्यासाठी काजूची रोपे ही रोपवाटिका यांच्या माध्यमातून खरेदी केली जातात. सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काजूची रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे या काजूच्या रोपांची विक्री होऊ शकत नाही. काजूची रोपे लावण्यासाठी खूप मोठे परिश्रम या रोपवाटिका यांच्या मालकांना घ्यावे लागतात. त्याच्यासाठी खूप मोठा खर्च असतो. काजूची रोपे शेतकऱ्यांनी खरेदी केली नाही तर ही रोपे जशीच्या तशी रोपवाटिकांमधून पडून राहतील. त्यातून रोपवाटिका मालकांचे नुकसान होईल.
त्या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध असलेली काजूची रोपे शासनाने खरेदी करून ती थेट शेतकरी, बचत गट अथवा वनविभागाकडे देऊन त्या काजूच्या रोपांची लागवड करण्यात यावी. त्यासाठी मनरेगा योजनेत निधीची तरतूद करण्यात यावी. तसे केल्यास फलोत्पादन व रोजगार हमिला चालना मिळेल, अशी मागणी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी कृषी व सहकार राज्यमंत्री कदम यांच्याकडे केली आहे.
चाकरमान्यांचा समावेश करा
कोकणात जे चाकरमानी आले आहेत, त्यांना मनरेगा योजनेत समाविष्ट करून घ्यावे. त्यांच्यासाठी फळबाग लागवड योजनेतून लाभ दिला गेला तर रोजगाराबरोबरच लागवडीचे उद्दिष्टही पूर्ण करणे शक्य होईल, असे ऍड. भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.