सत्ताधारी एवढे घाबरले का? यातच कुठेतरी पाणी मुरतंय... कोण म्हणाले वाचा...

Councilors press conference in savantwadi kokan marathi news
Councilors press conference in savantwadi kokan marathi news

सावंतवाडी (सिंधुदुर्ग ) : सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या कारभारात चुकीच्या प्रथा सुरू केल्या जात असल्याचा आरोप विरोधी गटाच्या गटनेत्या अनारोजीन लोबो व नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला. शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा जरूर उभारा; पण एखाद्या स्मारकाच्या ठिकाणी दुसरे स्मारक उभारू नये, त्यासाठी त्यांनी दुसरी जागा शोधावी, असा सल्लाही त्यांनी दिला. पाणी प्रश्‍नावरून सत्ताधारी एवढे घाबरले का? यातच कुठेतरी पाणी मुरतंय ते शोधून काढल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशाराही डॉ. परुळेकर यांनी दिला.

येथील पालिकेच्या मासिक बैठकीत पाणी प्रश्‍नावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर आरोप केला. यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, दिपाली वाडकर, भारती मोरे आदी उपस्थित होत्या. डॉ. परूळेकर म्हणाले, ‘‘पाणी प्रश्‍नाबाबत नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर सत्ताधारी आक्रमक झाले. ते एवढे आक्रमक झाले की सभागृहाचे नियम सुद्धा विसरले. त्यामुळे येत्या काळात जनतेसाठी पाणीप्रश्‍नावर प्रत्येक घरोघरी फिरून पाणी येते की नाही हे विचारणार आहोत. नागरिकांच्या प्रश्‍नावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधी नगरसेवकावर झालेल्या वैयक्तिक टीका चुकीची असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो.

अनारोजीन लोबो म्हणाल्या,

‘‘सत्ताधाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने प्रथा याठिकाणी घालण्यात येत आहेत. सुरुवातीला कुठल्याही प्रकारची मंजुरी न घेता नगराध्यक्षांची केबिन करण्यात आली. आता केशवसुत कट्ट्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ज्याठिकाणी एखाद्या समाज पुरुषाचे स्मारक आहे त्याठिकाणी दुसरे स्मारक उभारणे योग्य आहे का ? हे स्मारक उभारून केशवसुतांचा अपमान करायचा आहे का ? त्यामुळे नगराध्यक्षांनी हातघाई करून स्मारक उभारू नये.’’
श्री. बांदेकर म्हणाले, ‘‘डिसेंबरमध्ये नियोजित वेळेस येणारे पाणी आत्ताच वेळेत का येत नाही. हे पाणी कुठे चोरी केले जाते का किंवा अनधिकृतपणे वापरले जाते का याबाबत चौकशी करण्याची आपण मागणी केली. यावर सत्ताधाऱ्यांनी एवढे आक्रमक होणे चुकीचे आहे.’’

थिएटरचे भूमिपूजन घाईत का?
परुळेकर म्हणाले, ‘‘शहरात उभारल्या जाणाऱ्या कंटेनर थिएटरबाबत घाईगडबडीत भूमिपूजन करण्यामागचे इंगीत काय? मागच्या कौन्सिल बैठकीत यासंदर्भात जागा निश्‍चित झाली नसतानाही चुकीच्या पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. याबाबत निर्णय घेताना त्रिसदस्यीय समिती नेमून अधिकृत जाहिरात काढून जागा निश्‍चित करायला हवी होती. मात्र, असे काहीही झालेले नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com