राजापूर : तालुक्यात पीक विमा उतरविण्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी, विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट झाली आहे. या वर्षी तालुक्यातील खरिपाच्या ११,७६४ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १५.०२ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला आहे.
गतवर्षी अवकाळी पाऊस, क्यार वादळ आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसून शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतर्गंत विमा संरक्षण उतरविण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला आहे. या योजनेत काही ठराविक रक्कम भरून भातासह नागली पिकांचे विमा उतरविले जातात. या योजनेमध्ये जोखीमस्तर सर्व पिकांसाठी सत्तर टक्के ठेवला आहे.
हेही वाचा - मंडणगडच्या कलाकारांनी बिंबवले कोरोनाचे गांभीर्य
प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान आदी निकषांन्वये नुकसानीची छाननी करून विमा उतरविलेल्या शेतकऱ्याला भरपाई दिली जाते. गतवर्षी अवकाळी पाऊस, किडींमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
पिकाचा विमा उतरविला असता तर शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असती. मात्र, शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याला उदासीनता दाखविली होती. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट झाली आहे. गतवर्षी ३५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यातून १९.८१ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. या वर्षी ५३ जणांनी विमा उतरविला असून त्याच्यातून १५.०२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द
पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची गावे
भालावली, गोवळ, मूर, ताम्हाणे, पाचल, परुळे, मोसम, मोरोशी, कोंडोशी, केळवली, कशेळी, वाडापेठ, कोंडसर बुद्रुक, कोंडसर खुर्द. विमा संरक्षित क्षेत्र ः १५.०२ हेक्टर, शेतकरी ः ५३
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.