कोकणवासीयांनो सावधान; विजांचे तांडव सुरू आहे

due to heavy rain and vij effect on ratnagiri people one women with two ox dead in ratnagiri
due to heavy rain and vij effect on ratnagiri people one women with two ox dead in ratnagiri

रत्नागिरी : ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरु राहणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी अश्रय घ्यावा. विजेच्या खांबापासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली अश्रयास थांबू नये, विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

विजांच्या कडकडाटासह पडलेल्या परतीच्या पावसाने रत्नागिरीवासीयांना दणका दिला. दोन दिवसात चार ठिकाणी वीज पडल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले. तर एका घरातील वस्तूंचे नुकसान झाले. सलग पाचव्या दिवशीही विजांचे तांडव सुरु असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 13.50 मिमी. पाऊस झाला. त्यात मंडणगड 2.80 मिमी, दापोली 6.90 मिमी, खेड 29.20 मिमी, गुहागर 11.70 मिमी, चिपळूण 14.40 मिमी, संगमेश्वर 24.90 मिमी, रत्नागिरी 11.30 मिमी, राजापूर 13.50 मिमी, लांजा 6.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शनिवारपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सलग थांबून थांबून पावसाचा जोर सुरुच आहे. संगमेश्वर तालुक्यात तुळसणी येथे मंगळवारी सायंकाळी वीज कोसळली. यावेळी कचरा टाकण्यासाठी घराबाहेर रियाना दिलावर मुकादम (45) यांच्या समोरच विजेचा लोळ जमिनीवर आला. त्याच्या धक्क्याने श्रीमती मुकादम बेशुध्द पडल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी देवरुख येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. संगमेश्‍वर तालुक्यातील मेघी सोलकरवाडी येथेही पडलेली विज सागाच्या झाडावर पडली. ते झाड उभेच्या उभे चिरले गेले. त्या झाडाजवळ असलेल्या घरातील संदीप जयराम हसम व पूजा दीपक हसम हे विजेच्या धक्क्याने बेशुध्द पडले. त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्याबरोबरच घरातील पाच लहान मुलांना किरकोळ धक्का बसला. 

रात्रभार विजांच्या कडकडाट व मुसळधार पाऊस सुरुच होता. खेड तालुक्यातील धामणंद येथील अरविंद दताराम म्हापदी यांच्या शेतावरील दोन बैलांवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच रत्नागिरी तालुक्यातील मराठवाडी पाली येथे उदय मनोहर सावंत यांच्या घरावर वीज पडल्यामुळे घरातील वस्तूंचे अंशत: नुकसान झाले. ढगांचा जोरदार गडगडाट करीत पडलेल्या पावसामध्ये काल सायंकाळी राजापूर तालुक्यातील वाटूळ गौळवाडी येथील गणपत लक्ष्मण धावडे यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली. त्यामध्ये घराच्या भिंतीला तडे जाताना घरातील विजेचे वायरींग जळून खाक झाले. मात्र, कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान, आज सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामध्ये भातकापणी खोळंबलेली होती.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com