रत्नागिरी : तालुक्यातील विल्ये-आवळीची गौडा येथे बागेला भीषण आग लागली. या आगीच्या तांडवात काजूची 650 झाडे, 35 हापूस आंबा कलमे तसेच काढून ठेवलेल्या गवताच्या 124 वरंडी असे एकूण 1 लाख 92 हजार रुपयाचे नुकसान झाले. शेताची भाजावळ करताना शेजारच्या बागेमध्ये वणवा पेटू शकतो, याची कल्पना असतानाही हलगर्जीपणा दाखवून वणवा पेटण्यास कारणीभूत असलेल्या विल्येतील चौघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील विल्ये-तरवळ येथील अंकुश सखाराम शितप (वय 62) यांनी ही तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शितप यांची विल्ये येथे मोठी बाग आहे. बागेच्या शेजारच्या शेतामध्ये विष्णू शिवराग पानगले, सुरेखा विष्णू पानगले, यशवंत लक्ष्मण पानगले, नंदिता नंदकुमार पानगले (रा. विल्ये) हे शेताची भाजावळ करीत होते.
बागेत सुकलेले गवत असल्याने तेथे वणवा पेटू शकतो, याची पूर्वकल्पना पानगले यांना होती. तरी त्यांनी हलगर्जीपणाने भाजावळ केली. त्यामुळे त्याची ठिणगी उडून बागेत वणवा पेटला. ही आग एवढी भयानक होती की त्यामध्ये बागेतीलल काजुची 650 झाडे, 30 ते 35 हापूस आंब्याची कलमे, तसेच काढून ठेवलेल्या गवताच्या 124 वरंडी असे एकूण 1 लाख 92 हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी तक्रार अंकुश शितप यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.