मासळीसाठी आले आणि झाले क्वारंटाईन

Fisherman Quarantine sindhudurg
Fisherman Quarantine sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) - येथील बंदरात मासळी मिळू लागल्याने रत्नागिरीतून ट्रॉलर्समधून येथे दाखल झालेल्या 12 खलाशांना तपासणीअंती शासकीय विश्रामगृहात क्वारंटाईन कक्षात ठेवले आहे. येथील ट्रॉलर मालकाचे सर्व खलाशी रत्नागिरी येथे आपल्या गावी ट्रॉलर घेऊन गेले होते. रत्नागिरीत कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रत्नागिरीतील खलाशी येथे दाखल झाल्याची माहिती पोलिस व महसूल यंत्रणेला मिळाली. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाला माहिती देण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागाने संबंधित बोट मालकाला याची माहिती देत संबंधित सर्व खलाशांना तातडीने तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

शहरातील ट्रॉलर्सवरील बहुतांश खलाशी हे रत्नागिरी तसेच अन्य भागातील आहेत. लॉकडाऊननंतर येथील बंदरात सध्या चांगली मासळी मिळत असल्याने संबंधित खलाशांना येथे बोलविण्यात आले होते. संबंधित सर्व खलाशी हे ट्रॉलरवरूनच रत्नागिरीत गेले होते. त्यामुळे त्यांना कोठेही अडविले नाही. हे खलाशी पुन्हा येथे आल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांची तपासणी करून होम क्वारंटाइन करण्याची कार्यवाही करण्यात आली. 

येथील बोटीवरील खलाशी वर्गाची काळजी घेण्याबाबत शासन स्तरावर सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना निर्देश दिले आहेत. तरीही शासनाची संपूर्ण यंत्रणा यासाठी सहकार्याच्या भूमिकेत आहे; मात्र अशाप्रकारे खलाशी वर्गाने इतर ठिकाणी न जाता आपल्या बंदरातच थांबायला हवे. येथील बंदरात यानंतर नवीन खलाशी दाखल झाल्यास त्याची कल्पना इतर मच्छीमारांनी अगर बोट मालकांनी पोलिसांना, तहसीलदारांना द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केले. 

शासकीय यंत्रणेकडून कोरोना विषाणूंमुळे तालुक्‍यात कोणालाही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील असताना अशाप्रकारे आंब्याच्या गाडीतून अगर किनाऱ्यावरील बोटीतून इतर ठिकाणी असलेल्या व्यक्ती मालवणात आल्या तर मालवणातील आरोग्याच्या समस्या बिघडण्याची भीती आहे. यामुळे सर्वांनी जागरूक राहून आपल्या वाडीत आणि शेजारी मुंबई अगर इतर ठिकाणाहून नवीन व्यक्ती राहण्यासाठी आल्यास त्याची तत्काळ माहिती प्रशासनाला द्यावी, तरच कोरोनाच्या लढाईत आपण यशस्वी होऊ शकतो, असे तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील नौकांवर जिल्ह्याबाहेरील, परराज्यातील खलाशी कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमा पूर्णतः बंद केल्या आहेत. त्यामुळे मासेमारी नौकांवर उदरनिर्वाहासाठी आलेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील विविध भागात सुविधा उपलब्ध नसलेल्या मच्छीमार, खलाशी, मजुरांची निश्‍चिती करून तालुका व भागनिहाय यादी तयार करण्यात यावी. या यादीनुसार संबंधित मच्छीमारांना उपलब्ध असलेल्या सुविधा, अन्नधान्य तसेच अन्य सुविधा याची माहिती संबंधित जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना द्यावी. त्यांना नजीकच्या जिल्हा परिषद, पालिका शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक मैदाने, समाजमंदिर, खासगी मंगल कार्यालये, धार्मिक प्रार्थनास्थळे, संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील लिलावगृहे, औद्योगिक वसाहती या ठिकाणी आवश्‍यकतेनुसार जिल्हा प्रशासन, पालिका, पोलिस प्रशासनाच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात निवास, वस्त्र, भोजन, पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय देखभाल याची सोय करावी.

त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी संबंधित जिल्हाधिकारी, शासकीय रुग्णालय यांना माहिती देण्यात यावी. या परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सी प्रोटोकॉल पाळणे, अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे आदेश प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त महेश देवरे यांनी दिले आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com