दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण (ता. दोडामार्ग) परिसरातील 29.53 चौरस किलोमीटर क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून मंगळवारी घोषित करण्यात आले. याची अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. यात दहा महसुली गावांच्या भूभागाचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात सूचना केली होती. वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझमचा प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार आता हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित झाले आहे. या परिसरात वाघ, हत्ती, बिबट्या, गवा, सांबर, पिसोरी, भेडकी, चौशिंगा आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. याप्रमाणेच विविध प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर समृद्ध आहे. वन्यजीवांचा हा अधिवास संरक्षित होण्याच्या दृष्टीने या परिसराला संवर्धन राखीव घोषित करणे गरजेचे होते.
या अधिसूचनेद्वारे त्यास मान्यता मिळाली असून आता जैवविविधता जपतानाच या क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. अधिसूचनेनंतर आता हे क्षेत्र तिलारी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाईल. याचे एकूण क्षेत्र 2953.377 हेक्टर किंवा 29.53 चौरस किलोमीटर इतके राहणार आहे. अधिसूचनेनुसार तिलारी राखीव क्षेत्राच्या चतुर्सीमा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. तिलारी संवर्धनाच्या व्यवस्थापनासाठी राज्य शासन एक समिती स्थापन करेल.
दोडामार्ग वन परिक्षेत्रातील या संवर्धन राखीवसाठी बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे खुर्द, केंद्रे बुद्रुक, पाट्ये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे, मेढे या गावांतील काही क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अभयारण्याचा परिसर कोल्हापूर जिल्ह्यातील वाघित्रे, कोदाळी, कर्नाटकातील गुळंब, तालुक्यातील कोनाळ, मेढे, शिरंगे, खानयाळे व मांगेली सीमा, केंद्रे खुर्द बुद्रुक, पाट्ये, आयनोडे, हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे आदी गावांच्या सीमेपर्यंत विस्तारलेला असणार आहे.
सिंधुदुर्गातील पहिले संवर्धन राखीव
तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. राज्यात आता एकूण 62 संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी 13 संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. तिलारी पश्चिम घाटातील 13 वे संरक्षित क्षेत्र झाले आहे. तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रात निम सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय दमट पाणथळीची वने आहेत. पश्चिम घाटातील हा प्रदेश निसर्गाचा मौल्यवान ठेवा असून येथे विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी, कीटक, फुले व फुलपाखरे दिसून येतात. एवढेच नाही, तर कित्येक वनस्पती आणि प्राणी जगात फक्त येथेच आढळून येतात.
तीन राज्यांच्या सीमेवरील संपदा
तिलारी संवर्धन राखीव हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादई अभयारण्य, कर्नाटकातील भीमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन हे तीन क्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने विशेषतः वाघांच्या भ्रमणमार्गासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतील. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून आधीच घोषित करण्यात आला आहे. आता तिलारी संवर्धन राखीवच्या घोषणेमुळे जिल्ह्याच्या वन वैभवात अधिकच भर पडली असून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार संधीची उपलब्धताही होईल.
राज्याचा विकास करताना राज्याच्या वन वैभवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विकास आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे तसेच जैवविविधतेचे रक्षण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असून राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याला शासनाचे प्राधान्य राहणार आहे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
असे आहे क्षेत्र (सर्व आकडे हेक्टरमध्ये)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.