रत्नागिरी : समुद्रला चिकटलेल्या डोंगराला पडलेल्या चिरी घळीमधून समुद्राच्या पाण्याचा फवारा ३० ते ४० फूट उंच उडताना पहायला कोणाला आवडणार नाही. निसर्गाचा हा आविष्कार पहायला मिळतो गुहागर तालुक्यातील हेदवी गावाच्या समुद्रकिनारी. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या उमा महेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेने एक अवघड वाट आपल्याला बामणघळीपर्यंत नेते. पावसाळ्यात या वाटेने जाणे धोकादायक आहे. त्यामुळे सोबत गावातील माहितगाराला घेवून जावे लागते. या स्थानाला बामणघळ असे नाव का पडले ते माहिती नाही.
येथे डोंगरातील कातळाला 20 ते 25 फुट लांबीची चीर पडली आहे. त्यालाच घळ असे म्हणतात. वरुन दोन्ही बाजुला दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे 6 फुट लांब, २ फुट रुंद आणि ४ फुट उंच अशी कपारी आहे. उधाणाच्या भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते. हा वेग इतका असतो की निमुळत्या घळीतून हे पाणी 30 ते 40 फुट उंच उडते.
अर्थात हे दृष्य फक्त पावसाळ्यात समुद्राला उधाण येते त्यावेळीच पहायला मिळते. ऑगस्ट महिन्यानंतर दिवाळीपर्यंत अमावास्या, पौर्णिमेला दुपारी १२ वाजता खात्रीने ही दृष्ये पहायला मिळतात. त्यानंतर गुढीपाडव्या (वर्षप्रतिपदेला) येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे वेळीही हा साक्षात्कार पहाण्याची संधी मिळते. मात्र मे महिन्यात समुद्र शांत असताना हे दृष्य सहसा पहाता येत नाही..
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.