रत्नागिरी : अंड्यांची चोरी ते कासव महोत्सवापर्यंत रोचक प्रवास

मोहन उपाध्ये; वेळास गावचा झालाय संपूर्ण कायापालट, २००५ पासून सह्याद्री निसर्गमित्र संस्थेची संवर्धन मोहीम
An interesting journey from egg theft to turtle festival
An interesting journey from egg theft to turtle festivalsakal

रत्नागिरी : कासवाच्या अंड्यांची चोरी करून ती खायची, विकायची. एके काळी एक कासव २५० अंडी घालत होते. एक दिवस असा आला की किनारे ओस पडले आणि कासवेच यायची बंद झाली. पण आज याच गावात कासव महोत्सव होतोय. कासवाच्या घरट्याच्या संरक्षणामुळे येथे जागतिक स्तरावरून पर्यटक येतात. कासवामुळे गावचे अर्थकारण बदलले. गेल्या १९ वर्षांचा हा प्रवास रोचक आहे. मंडणगड तालुक्यातील कासवांचे गाव ठरलेल्या वेळास गावचा हा प्रवास उलगडला कासव संवर्धन मोहिमेतील मोहन उपाध्ये यांनी.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिन कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी हा रोचक प्रवास मांडला. ते म्हणाले की, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे व सहकारी २००२ मध्ये वेळासला गेले असता किनाऱ्यावर पांढऱ्या रंगाची कवचे मिळाली. ही कवचे कसली विचारल्यावर कोणी बोलत नव्हते. परंतु गोपीनाथ महाडिक (वय ८६) यांनी नोव्हेंबरपासून येथे कासवे येतात आणि आम्ही ती खातो, असे सांगितले. परंतु आज महाडिक काका कासव संवर्धनात अग्रणी आहेत. थंडीच्या काळात रात्री लोक किनाऱ्यावर बसायचे. जे कासव समोर येईल त्याची अंडी मी घेणार असे ठरलेले असायचे. सुमारे ४० वर्षांपूर्वी तब्बल ८० कासवे अंडी घालत होती. गावात ही अंडी खाल्ली जायची. काही अंडी बैलांना व्हिटॅमिन्स, प्रोटिन्ससाठी म्हणून खायला दिली जायची. कारण दिवाळीत होणाऱ्या झोंबीसाठी (झुंज) बैल तयार करायचा असतो.

यानंतर सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने कामाला सुरवात केली. ग्रामस्थांशी संवाद, सर्व गावांच्या ग्रामसभांमध्ये बोलणे केले. २००५ पासून संवर्धन मोहिमेत ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. २००६ मध्ये महोत्सव सुरू केला. पुढील चार वर्षांत ८० किनाऱ्यांवर कासवे अंडी घालण्यासाठी येत होती, अशी माहिती मिळाली. पण सर्वत्र ती अंडी खाल्ली जात होती. कासव समुद्रात दुडुदूडू पावलांनी जाताना पाहिल्यानंतर ग्रामस्थ, पर्यटकांना कासव संवर्धनाचे महत्त्व पटले. त्याचा परिणाम चांगला झाला.

लॉस्ट वेळासची ओळख बदलतेय!

मंडणगडच्या टोकाला असणारे हे आमचे लॉस्ट वेळास. तीन वर्षांपूर्वी येथे मोबाईलची रेंज आली पण आता कासवांमुळे गावाची ओळख बदलतेय. गावात २२५ घरे असून पर्यटक येथे येऊन राहतील, असे ग्रामस्थांना वाटलेच नव्हते. पण ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. कोणत्याही गावांत निसर्ग संवर्धनासाठी अशी एकजूट असली पाहिजे. ग्रामस्थांनी कासवांची अंडी खाणे सोडले. पर्यटनातून त्यांची उपजीविका सुरू आहे. लोक किनारा स्वच्छ करतात. खाण कंपनी सीएसआर फंडातून मदत करते, असे मोहन उपाध्ये म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com