रत्नागिरीतील पूरग्रस्त मदतीपासून वंचित 

रत्नागिरीतील पूरग्रस्त मदतीपासून वंचित 

रत्नागिरी - सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी मदतीची आवश्‍यकता आहे; मात्र स्थानिक प्रशासनाकडून रत्नागिरी तालुक्‍यातील पूरग्रस्त भागात मदत वाटप करण्यात दिरंगाई केली आहे. काही ठिकाणी मंडळ अधिकाऱ्यांनी भेटीही दिलेल्या नाहीत, तर अनेक घरांचे पंचनामेच झालेले नाहीत. प्रशासनाच्या या कारभाराविरोधात आमदार उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गावडेआंबेरे, सोमेश्‍वर, चांदेराई भागात भेटी दिल्यानंतर तेथील पाहिलेली परिस्थिती पत्रकारांपुढे मांडली. आमदार सामंत म्हणाले, तालुक्‍यातील चांदेराई, कोळंबे, उमरे, सोमेश्‍वर गावांना पुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. तेथील घरांचे पंचनामे योग्य पद्धतीने झालेले नाहीत. अनेक गावांना मंडळ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. तालुक्‍यातील प्रत्येक आपद्‌ग्रस्ताला तत्काळ मदत वाटप झाली पाहिजे, अशा सूचना दिल्यानंतर प्रशासन जागे झाले.

सायंकाळी सोमेश्‍वर येथे धान्य वाटप केले जाणार आहे. चांदेराई येथील रेशनधान्य दुकान पाण्याखाली होते. आतील सुमारे हजार किलो धान्य भिजून कुजले आहे. ते उचलण्याची परवानगीही प्रशासन स्थानिक दुकानदाराला देत नाहीत. त्या कुजलेल्या धान्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील आठ ते दहा कुटुंबांमध्ये रोगराई पसरली असती. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर कार्यवाही झाली. सुरवातीला ते धान्य परवानगीशिवाय उचलू शकत नाही, अशी उत्तरे दिली गेली होती. या परिसरातील लोकांना दहा दिवसांत अन्न मिळालेले नाही. अनेक लोकांनी नातेवाइकांकडे स्थलांतर केले आहे. तरीही प्रशासनाची मदत वेळेत पोचत नाही. 

मजगाव येथे सहा घरांचे नुकसान झाले होते. त्यातील पूर्ण नुकसान झालेल्या दोन घरांना 95 हजार रुपये, तर उर्वरितांना सहा हजार रुपये मिळतील. पंचनामा करताना प्रशासनाने पुराचे पाणी एक दिवसच होते, अशी नोंद टाकली होती.

गावडेआंबेरेमधील लोक तीन दिवस पाण्यात होते. चांदेराईतील काही घरांचे पंचनामेच केलेले नव्हते. त्यांच्या नोंद टाकण्याच्या सूचना केल्या. ही जबाबदारी कुणा एकाची नाही तर सर्वांची आहे. प्रशासन कुणा एकामुळे चालत असेल, तर तसे कुणीच समजू नये. मदत वाटप करताना कोणत्याही पाकिटावर स्टीकर दिसला तर माझ्याशी गाठ आहे, असा इशाराही दिल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले. तसेच चांदेराई येथील पुलाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी सांगितले. 

आपद्‌ग्रस्तांना मदत 
कोल्हापूर, सांगलीतील आपद्‌ग्रस्तांना आवश्‍यक असलेल्या गोष्टींचा पुरवठा आम्ही करणार आहोत. आठ दिवसांनी दोन हजार लोकांना भांडी देणार आहोत. यंदा गणेशोत्सव साजरा करणार, पण कार्यक्रमावर जास्त खर्च करणार नाही. ती रक्‍कम आपद्‌ग्रस्तांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com