`जलजीवन`चे उद्धीष्ट गाठणे सिंधुदुर्गला कठिण 

Jal Jivan Mission Expedition Sindhudurg district
Jal Jivan Mission Expedition Sindhudurg district

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्‍शन देण्यासाठी केंद्राने "जल जीवन मिशन' अभियान सुरू केले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात या योजनेतून जिल्ह्यातील 100 टक्के कुटुंबाना वैयक्तिक नळ कनेक्‍शन देण्याचे उद्दिष्ट आहे; परंतु किमान यावर्षी तरी 100चे उद्दीष्ट साध्य करणे जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला शक्‍य नाही. कारण जिल्ह्यातील 40 टक्के भागात नळ योजनाच पोहोचलेली नाही. परिणामी "आधी नळ योजना राबवू, नंतर वैयक्तिक नळ कनेक्‍शन जोडणी', असा उपक्रम राबवावा लागणार आहे. याबाबत जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वरिष्ठ यंत्रणेला याबाबत कळविले आहे. 

केंद्राने राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून जल जीवन मिशन ही नवीन योजना 2020-21 या आर्थिक वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून वाडी-वाडत नळ योजना राबविल्या होत्या; परंतु जल जीवन मिशनमध्ये वाडीसाठी नाही तर प्रत्येक कुटुंबासाठी योजना राबवून वैयक्तिक नळ जोडणी दिली जात आहे. जिल्ह्यात या योजनेला प्रारंभ होण्यापुर्वी सर्व्हे करण्यात आला होता. जिल्ह्यातील किती कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी आहे आणि किती कुटुंबाजवळ नाही, असा हा सर्व्हे होता. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण 1 लाख 89 हजार 270 कुटुंबे असल्याचे पुढे आले होते. यातील 70 हजार 763 कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी असल्याचेही या सर्व्हेत निष्पन्न झाले होते. त्यामुळे 1 लाख 18 हजार 507 कुटुंबाला नळ जोडणीचे उद्दिष्ट 2020-21 मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला आले होते. 

60.29 टक्के कुटुंबाकडे नळ जोडणी पूर्ण 
योजना लागू होण्यापुर्वी जिल्ह्यातील 1 लाख 89 हजार 270 एक लाभ धारकांपैकी 70 हजार 763 कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी असल्याने 1 लाख 18 हजार 507 कुटुंबाला ही नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील मे 133, जून 2 हजार 362, जुलै 2 हजार 197, ऑगस्ट 1 हजार 753, सप्टेंबर 2 हजार 107, ऑक्‍टोबर 407, नोव्हेंबर 3 हजार 513, डिसेंबर 2 हजार 696 अशाप्रकारे वैयक्तिक नळ जोडणी पूर्ण झाली आहे. 6 महिन्यात एकूण 15 हजार 168 नवीन नळ कनेक्‍शन देण्यात आली आहेत. एकूण वैयक्तिक जोडणीच्या 60.29 टक्के काम झाले आहे. त्यामुळे आता 75 हजार 154 एवढी नळ कनेक्‍शन देणे शिल्लक राहिली आहेत. 

28 हजारांवर कुटुंब स्वावलंबी 
ग्रामीण भागातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती व कुटुंबाला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल या योजना राबविल्या. आता जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यातील 28 हजार 185 कुटुंबाने यातील एकाही योजनेचा लाभ न घेता पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे. एवढ्या कुटुंबानी शासकीय योजनेचा लाभ न घेता आपल्या घरात पाणी उपलब्ध केल्याने त्यांनी शासकीय नळ कनेक्‍शनची गरज नसल्याचे सांगितले आहे. ते पिण्याच्या पाण्यासाठी स्वावलंबी आहेत. 

सर्वाधिक काम दोडामार्ग तालुक्‍यात 
वैयक्तिक नळ जोडणीचे सर्वाधिक काम दोडामार्ग तालुक्‍यात 81.66 टक्के झाले आहे. पाठोपाठ वैभववाडीत 69.16 टक्के झाले आहे. त्या पाठोपाठ कणकवलीत 68.94 टक्के झाले आहे. देवगडमध्ये 61.02 टक्के, सावंतवाडीत 59.22 टक्के, कुडाळात 57.53 टक्के, वेंगुर्लेत 53.81 टक्के काम झाले आहे. सर्वांत कमी काम मालवण तालुक्‍यात 46.28 टक्के झाले आहे. 

...तर नळ जोडणी अशक्‍य 
जिल्ह्याला जल जीवन मिशनमधून एक लाख 18 हजार 507 नळ कनेक्‍शन देण्याचे 2020-21 साठी उद्दिष्ट होते. त्यासाठी नियोजन सुरु होते; परंतु जिल्ह्याच्या किमान 40 टक्के कुटुंबा पर्यंत नळ योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे तेथे यावर्षी नळ जोडणी देणे शक्‍य नाही. ज्या भागांत नळ योजना नाही. तेथे पहिली योजना राबवावी लागेल. त्यानंतर तेथे वैयक्तिक नळ जोडणी द्यावी लागेल. जिल्ह्यात सध्या 75 हजार 154 कुटुंबाना वैयक्तिक नळ जोडणी शिल्लक आहे. याबाबत जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाला कळविले आहे, अशी माहिती शाखा अभियंता वैभव वाळके यांनी दिली.  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com