रत्नागिरी : कोंकण रेल्वेच्या सुमारे 700 किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी सुमारे 1100 कोटी खर्च अपेक्षित आहे. हे काम ठोकुर ते वेरणा (टप्पा 1) व वेरणा ते रोहा (टप्पा 2) अशा दोन टप्प्यात विभागणी केली आहे. टप्पा 1 मधील ठोकुर ते उडुपी हे सुमारे 200 किमीच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम 75 टक्क्यांपर्यंत झाले आहे. त्यामुळे कोकण विकासाच्या फास्ट ट्रॅकवर आला आहे.
रेल्वे मंत्रालयाने हाती घेतलेल्या मिशन इलेक्ट्रिफिकेशन या मोहिमेंतर्गत रेल्वेच्या सुमारे 2 लाख किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे 2023 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरण केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले होते. डिझेलच्या अतिवापरामुळे देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने देशात प्रदुषणाची समस्या बळावली आहे. यासाठी रेल्वेने मिशन इलेक्ट्रिफिकेशन ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेमुळे इंधनाचा वापर तर कमी होईल आणि रेल्वेगाड्यांची संख्या, वेग वाढविता येईल.
नव्या गाड्यासुद्धा सुरु करता येणार आहे. याच पार्श्वभुमीवर कोकण रेल्वे मार्गाचेही विद्युतीकरणाचा निर्णय झाला होता. त्यानुसार कार्यवाही सुरुही झाली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याचा वापर सुरु होण्याची शक्यता आहे. टप्पा 1 मधील ठोकुर ते उडुपी विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरण 70 टक्क्यापर्यंत झाले आहे. रोहा ते रत्नागिरी काम बहूतांश झाले असून रत्नागिरी ते कुडाळ स्थानकाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
कोंकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्यामुळे पासिंगसाठी गाड्यांना थांबवावे लागते. डोंगर-नद्यांमुळे कोंकण रेल्वेचे पूर्ण दुहेरीकरण हे कठीण व खर्चीक आहे. त्यासाठी रेल्वे दर दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर एक क्रॉसिंग स्टेशन तयार करीत आहे. कळंबणी, कडवई, पोमेंडी, खारेपाटण, अचिर्णे सापे -वामने ही नवीन स्टेशने पूर्ण झाली की क्रॉसिंगची ठिकाणे वाढून गाड्यांना जास्त वेळ थांबवावे लागणार नाही. सापे वामने स्टेशन महाड पासून जेमतेम 5 किलोमीटर अंतरावर आहे. अर्चिणेमुळे सिलिका उद्योगाला चालना मिळेल. शिवाय या गावांना रेल्वेचा लाभ मिळाला की ती गावे विकासाच्या मार्गावर येणार आहेत.
डिझेलच्या तुलनेत विजेवरील इंजीनचा वेग वाढविणे आणि कमी करणे ही प्रक्रिया अधिक जलद गतीने होते. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होतो. तसेच प्रदूषणाचा त्रास कमी होईलच शिवाय इंधनाचा बेसुमार वापर कमी होईल. मालाच्या व प्रवाशांच्या वाहतुकीमुळे रेल्वेच्या महसुलात प्रचंड वाढ होईल.
- अॅड विलास पाटणे, रत्नागिरी
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.