रत्नागिरी : गेली पंधरा वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय दळण-वळणमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात केली होती. त्यामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र महामार्गावरील चौदा पुलांपैकी चारच पुलांची कामे सुरू झाली असून उर्वरित पुलांची कामे दीड वर्षात पूर्ण करण्याचे आव्हान राहणार आहे.
गोव्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे मुंबई-गोवा रस्ता बांधकाम पुढील वर्षांपर्यत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे दिली. ते म्हणाले, की हा रस्ता गोवा तसेच महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता बांधण्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून हा रस्ता पूर्ण झाल्यावर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग रायगड जिल्ह्यात पळस्पे ते इंदापूर हा १५ वर्षांपूर्वी सुरू झालेला कामाचा टप्पा आजही प्रलंबित आहे. मधल्या काळात दोनवेळा ठेकेदार कंपन्या बदलण्यात आल्या. तरीही कामाला वेग मिळालेला नाही.
१०० किलोमीटरवर एक टोल
चौपदरीकरणाबरोबरच महामार्गावर टोलनाकेही उभे होत आहेत. जवळपास १०० किलोमीटरवर एक टोलनाका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच ते सुरू केली जाणार आहेत.
१३० कि.मी. मार्गाचे काम ठप्पच
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते लांजा या जवळपास १३० कि.मी.च्या मार्गाचे काम जवळपास ठप्पच आहे. या मार्गावरील ठेकेदार कंपन्या काम करीत नसल्याने त्या काळ्या यादीत गेल्या आहेत. हा टप्पा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता सरकारसमोर असणार आहे.
एक नजर...
रस्त्यासाठी सुमारे ११ हजार कोटींचा खर्च येणार
गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा प्रवास सुखद होणार
पळस्पे ते इंदापूर हा कामाचा टप्पा आजही प्रलंबित
खेड ते लांजा मार्गाचे काम जवळपास ठप्पच
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.