कोकणी मेव्याची ब्रँडींग करणारा रत्नागिरीचा हिरा हरपला ; जाणून घ्या नाना भिडे यांच्याविषयी...

nana bhide story in ratnagir
nana bhide story in ratnagir

रत्नागिरी : ब्रँड हा शब्द परवलीचा नव्हता. त्या काळात उत्पादनांचा ‘योजक‘ ब्रँड नाना भिडे यांनी बनवला आणि पुढच्या काळात राज्यभरात योजकची उत्पादने ही रत्नागिरीची एक ओळख बनली. रत्नागिरीसारख्या सत्तरच्या काळातील दुर्गम भागातून निर्माण केलेल्या उत्पादनांना राज्य व राज्याबाहेर स्थान मिळवून देणारे एवढीच नाना भिडे यांची पुरेशी ओळख नाही. नानांचे वेगळेपण हे त्यांच्या दूरदृष्टीत होते. आजही कोकणी मेवा मोठ्या प्रमाणावर फुकट जातो. त्याला किंमत मिळू शकते. मात्र त्यासाठी त्याचे मूल्य जाणले पाहिजे, असे म्हणत कोकणी मेवा प्रक्रिया करून सर्वदूर पोचवणार्‍या नाना भिडे यांचे 16 मे रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या वेगळ्या पैलूंची नोंद येथे केली आहे.

कोकणचे स्वरूप ओळखणारे नाना भिडे

रत्नागिरीसारख्या सत्तरच्या काळातील दुर्गम भागातून निर्माण केलेल्या उत्पादनांना योजक उत्पादने म्हणून राज्य व राज्याबाहेर स्थान मिळवून देणारे एवढीच नाना भिडे यांची पुरेशी ओळख नाही. नाना हे स्वरूपानंदांचे निस्सिम भक्त होते. स्वरूप याचा अर्थ स्वतःचे रूप ओळखणे. नाना यांनी स्वतःच्या रूपाची कधीच चिंता केली नाही. पण स्व म्हणजे कोकणवासी असे म्हटले तर कोकणचे स्वरूप त्यांनी जाणले आणि त्याचा ब्रँड तयार झाला. एक उद्योजक दुसर्‍या उद्योजकाची नेमकी ओळख कशी सांगतो हे रत्नागिरीतील आणखी एक दूरदृष्टीचे उद्योजक दीपकशेठ गद्रे यांनी नानांबाबत बोलताना कोकणी मेवा हा अलंकारिक शब्द न राहता ते रोजगाराचे साधन बनले, असे वक्तव्य केले.

रोजगाराचे हे साधन नाना भिडे यांनी दाखवून दिले. हे त्यांचे सर्वाधिक मोठेपण. कोकणात उद्योजकांची वानवाच. नाना भिडे त्यांच्या समकालीनपैकी एम. डी. नाईक, गंगाधरभाऊ पटवर्धन, त्यांच्या आधीचे शिर्के आणि फार मागे जायचे तर एकोणिसाव्या शतकातच लोखंडाचा कारखाना चालवणारे मधल्या आळीतील खेर अशी उदाहरणे सांगता येतील. प्रक्रिया उद्योगात पायोनियर ठरावेत अशा लोकांसमवेत पार दापोलीत पेंडसे यांचेही नाव पुढे येते; मात्र या पलीकडे मोठे उद्योग कोकणात उभारले गेले नाहीत.

सध्याच्या काळातही उद्यमशील लोकांची आणि उद्योगांची नावे हाताच्या बोटावरच मोजावी लागतील. येथील एमआयडीसी त्याची साक्ष देईल. म्हणून नानांना द्रष्टे म्हणायचे. भिडे हॉटेल उत्तम तर्‍हेने सुरू असताना नाना प्रक्रिया उद्योगाकडे वळले. यात यश मिळवले आणि अनेकांना प्रेरणाही दिली. जांभूळ पोळी परदेशात नेणारा देवरुखातील मंदार भिडे असो वा आसूदजवळ फणसावर प्रक्रिया करणारे उपेंद्र पेंडसे असोत, त्यांचे पूर्वसुरी म्हणून नानांचाच उल्लेख करावा लागेल. व्हॅल्यू अ‍ॅडेड हा हल्ली सततचा शब्द झाला आहे. नानांनी तो प्रत्यक्षात आणून कोकणी मेव्याला ओळख आणून दिली. आता त्या वाटेवर अनेकजण चालत यशस्वी झाले आहेत.

हेही वाचा-कोल्हापूर जिल्हयातील मुगळी गावात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह ; गाव स्वघोषित बंदच...
उद्योगात यशस्वी झाले म्हणून प्रत्येक गोष्टीतले आपल्याला कळते असा आविर्भाव त्यांनी कधीच दाखवला नाही. अनेक संस्थांशी अगदी नजीकचा संपर्क असला तरी सभासंमेलने गाजवण्यात त्यांनी रस दाखवला नाही. मात्र उद्यमशील किंवा उद्योग करू इच्छिणार्‍यांशी त्यांचा सतत संपर्क असे. शून्य फोडायला काय लागते हे माहित असल्यामुळे असा प्रयत्न करणार्‍याच्या मी पाठीशी राहतो, असे ते नेहमी सांगत. नवीन उद्योजकाला पाठीवर थाप मारताना अर्थसाह्यही देण्याची त्यांची तयारी असे.

कोकणात उद्योगाची वेगळी दिशा दाखवून वेगवेगळ्या संस्थांमध्ये वावरत असले तरी नानांचा वेश साधा, अत्यंत वक्तशीर, त्यांच्या वेगळ्या विचारांनी तेथेही उठून दिसणारे. फणस जास्तीत जास्त फुकट जातो, त्यामुळे लहानात लहान आठीळं होणारी जात विकसित करा असे कृषी विद्यापीठाला ते सांगत. सर्व स्तरावर वावरत असले तरी ते एकप्रकारे अलिप्तच असत. कोरोना काळात निधन झाल्याने अंत्ययात्रेमध्ये माणसे जमण्यावरही बंधने होती. नानांच्या स्वभावाला ते साजेसेच झाले म्हणायचे. फुकटचे उमाळे आणि कृत्रिमपणा येथेही टाळला गेलाच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com