मालवण - मंत्रालयात भ्रष्टाचाराची दुकाने चालत आहेत. मुख्यमंत्र्याचे दालन असो की अन्य कोणाचेही सर्व कामांना स्थगिती द्यायची. ठेकेदाराला बोलवायचे आणि तोडपाणी करायचे या व्यतिरिक्त काहीही केले नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेली तीन महिन्यातील कामे सांगा. कोणत्याही विकासाचे काम मुख्यमंत्र्यांनी केले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांकडून कामाची अपेक्षा ठेवू नका. हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस येणार नाहीत अशी घणाघाती टीका खासदार नारायण राणे यांनी आज आंगणेवाडी ता. मालवण येथे केली.
आंगणेवाडीतील भराडी मातेचे खासदार नारायण राणे यांनी आज सायंकाळी दर्शन घेतले. यावेळी नीलम राणे, आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीचा दौरा केला. मात्र या दौर्यात त्यांनी कोणत्या समर्थकाला, विरोधकांना भेटण्याचे सौजन्य दाखविले नाही. नाणार प्रकल्पाबाबत ते काही बोलले नाहीत. कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या दरम्यान सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात सामना मुखपत्रातून आलेल्या जाहिरातीतून मुख्यमंत्र्यांनी कात टाकली. शब्दाला न जागणारा माणूस म्हणजे नवे मुख्यमंत्री होय. मुख्यमंत्र्यांची क्षमता नाही. या सरकारचा कारभार पाहता हे राज्य अधोगतीकडे जात असल्याची टीका त्यांनी केली.
जोपर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत राज्यातील जनतेला सुगीचे दिवस येणार नाहीत. त्यामुळे राज्यात लोककल्याणकारी राज्य येऊ दे असे साकडे भराडी मातेस घातल्याचे खासदार राणे यांनी सांगितले. भराडी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. त्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री येत असल्याने ते काहीतरी बोलतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र जे देवाला वेळ देऊ शकत नाहीत ते सर्वसामान्यांना काय देणार? असा प्रश्नही खासदार राणे यांनी उपस्थित केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.