मुंबई - गोवा महामार्गालगतच्या वृक्षांवर पक्ष्यांसाठी घरटी 

Nest For Birds On Tree On Mumbai Goa Highway
Nest For Birds On Tree On Mumbai Goa Highway

कणकवली ( सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणात रस्तालगची 60 हजाराहून अधिक वृक्षांची कत्तल झाली. या वृक्षांवर गेली अनेक वर्षे वास्तव्यात असलेले कावळे, बगळे, चिमण्या व इतर पक्षी विस्थापित झाले. हे पक्षी अन्य भागात स्थलांतरित होऊ नयेत यासाठी आता मुंबई गोवा महामार्गावर तब्बल 600 आर्टिफिशियल घरटी बांधली जाणार आहेत. त्यासाठी 3 लाखांच्या खर्चाची तरतूद केंद्राने केली आहे. 

महामार्ग चौपदरीकरणात शेकडो घरे, मालमत्ता बाधित झाल्या, त्याचप्रमाणे हजारो झाडे आणि त्यावरील कावळ्या, चिमण्या व इतर पक्षांची घरटी मोडीत निघाली. भूसंपादन प्रक्रियेत जमिन मालकांना जागा आणि घराचा मोबदला लाखांत, कोट्यवधींमध्ये मिळाला. पण त्या झाडांवर अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेले अनेक पक्षी विस्थापित झाले आणि उपेक्षितही राहिले.

वस्तुतः ही झाडे तोडण्यापूर्वीच विस्थापित होणाऱ्या पक्षांसाठी लगतच्या झाडांवर पर्यायी घरटी उभी करायला हवी होती. मात्र वृक्षतोड झाल्यानंतर दीड ते दोन वर्षानंतर केंद्राने पर्यायी घरटी बांधण्याबाबतची जाग आली. त्यानंतर चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या कंपन्यांनी आर्टिफिशल घरट्यांसाठी तीन लाखांची रक्‍कम वनविभागाकडे जमा केली. वनविभागाने हा प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवला असून मे 2020 अखेर पर्यंत महामार्ग दुतर्फा असलेल्या झाडांवर 600 घरटी लावली जाणार आहेत. पाचशे रुपयांना एक याप्रमाणे 600 आर्टिफियल घरट्यांसाठी 3 लाख रूपये खर्च केला जाणार आहे. 

पक्षी घरटी बांधण्यासाठी 30 ते 40 वर्षाचे झाड निवडतात. तसेच प्रत्येक पक्षासाठीचे घरटे वेगवेगळ्या आकाराचे असते. त्यामुळे या आर्टिफिशियल घरट्यांमध्ये पक्षी वास्तव्याला येणार का? असा प्रश्‍न पक्षीप्रेमींना पडला आहे. तर गेल्या दोन वर्षात विस्थापित झालेल्या पक्षांनी त्या त्या भागातील दुसरी झाडे निवडली आहेत. तर काही पक्षी अन्य जंगलमय भागात स्थलांतरित झाले आहेत. ते या घरट्यांमध्ये कसे परत येणार असाही प्रश्‍न पर्यावरण प्रेमींतून उपस्थित होत आहे. 

कृत्रिम घरटी ही साधारणतः एकाच आकाराची असतात. चिमण्या आणि कावळे ही घरटी काही प्रमाणात स्वीकारतील. पण हॉर्नबिल, बुलबुल आदींसारखे पक्षी ही घरे अजिबात स्वीकारणार नाहीत. तसेच घरटी लावताना वाऱ्या - पावसाची दिशा बघणंही महत्वाचं आहे. अन्यथा कुठेही टांगलेल्या घरट्यांमध्ये पक्षी येणार नाहीत. या सर्वांचा विचार करूनच घरटी लावायला हवीत. 
- प्रा. योगेश कोळी, प्राणीशास्त्रज्ञ 
 
खारेपाटण ते झाराप या महामार्गावर कृत्रिम घरटी लावण्यासाठी दोन्ही ठेकेदार कंपन्यांनी निधी जमा केला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. महामार्ग दुतर्फा 600 घरटी लावली जाणार आहेत. काही तांत्रिक कारणामुळे या प्रक्रियेला उशीर झाला होता. मात्र मे अखेरपर्यंत घरटी लावली जाणार आहेत. 
- समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक वनविभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com