दाभोळ ( रत्नागिरी ) - भात पीक हे कोकणातील महत्वाचे पीक आहे. कोकणामध्ये बरेचसे भाताखालचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. येत्या खरीप हंगामात दापोली तालुक्यातील कुडावळे येथे भात लावणी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. एकही क्षेत्र लागवडीविना राहणार नाही, यासाठी बियाणे, औजारे यांची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. कुडावळे येथील महाजन काका यांनी ही जबाबदारी घेतली असून अन्य गावातील शेतकऱ्यांनीही पुढे येऊन हे आव्हान स्वीकारले पाहिजे. विद्यापीठ त्यांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी दापोली येथे केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार योगेश कदम आणि शेखर निकम यांचे हस्ते सर विश्वेश्वरैया सभागृहात झाले.
डॉ. संजय सावंत म्हणाले, सद्यस्थितीत दापोली - रत्नागिरी सारख्या ठिकाणी 92 टक्के भाजीपाला हा इतर जिल्ह्यातून येत असून येथे फक्त 8 टक्के भाजीपाला पिकवला जातो. येत्या दोन वर्षात हे प्रमाण 25 टक्क्यावर न्यायचे आहे.
विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी कोकणातील शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेती एक उत्तम पर्याय ठरू शकतो असे सांगितले. या वेळी शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, कुलसचिव प्रमोद सावंत, कृषी विद्या विभागप्रमुख प्रशांत बोडके आणि सहयोगी अधिष्ठाता उत्तम महाडकर उपस्थित होते. कार्यक्रमाला 500 हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
सेंद्रिय शेती करणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा सत्कार
याप्रसंगी कोकणातील पाचही जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले. त्यात किरण पाटील, सुशांत नाईक, संतोष दिवकर, सूर्यकांत कुंभार यांचा समावेश आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.