

रत्नागिरी : एमव्ही बीटू (Bitu) रिव्हर (River) या जहाजाचे पश्चिम आफ्रिकेमध्ये समुद्री चाच्यांनी अपहरण केले आहे. त्यावरील १० खलाशांना बंधक बनवले आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन तरुण, तर राज्यातील पाच जणांचा समावेश आहे. बंधक बनवलेल्या तरुणांबाबत कोणतीही माहिती त्यांच्या पालकांना मिळालेली नाही. ११ दिवस झाले तरी या चाच्यांची अजून कोणतीही मागणी नाही. त्यांच्याबाबत काळजी वाटत असून आम्ही तणावाखाली आहोत. या बंधकांना सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी आणि आम्हाला दिलासा द्यावा, अशी विनवणी बंधक असलेल्या मुलाचे वडील जावेद मिरकर यांनी केली. समीन मिरकर आणि रिहान सोलकर असे समुद्री चाच्यांनी बंधक बनवलेल्या तरुणांची नावे आहेत.