राजापूर (रत्नागिरी) : गेली चार वर्षे सत्ताधाऱ्यांना साथ देणाऱ्या भाजपच्या एकमेव नगरसेवकाने अंदाजपत्रक मंजुरीच्या बैठकीमध्ये तटस्थाची भूमिका घेतली. त्याला सत्ताधारी नगरसेवकांच्या अनुपस्थितीची जोड मिळाली. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर चार वर्षामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदा तांत्रिकदृष्ट्या पराभवाची नामुष्की ओढवली. यातून पालिकेमध्ये नव्या राजकीय घडामोडीला सुरवात झाली आहे. लोकनियुक्त सतरा आणि स्वीकृत दोन अशा 19 नगरसेवक असलेल्या येथील नगर पालिकेमध्ये दोन नगरसेवकांच्या आकस्मिक निधनानंतर कॉंग्रेस सहा, शिवसेना सात आणि राष्ट्रवादी-भाजपचे प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला भाजपची साथ आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीकडे आठ तर विरोधी शिवसेनेकडे सात संख्याबळ आहे. भाजपच्या साथीने सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने सभागृहामध्ये सहज बाजी मारली जाते. गत महिन्यामध्ये अर्थसंकल्प मंजुरीच्या बैठकीमध्ये सत्ताधारी गटाचा सभागृहामध्ये तांत्रिक पराभव झाला होता. अर्थसंकल्प मंजुरीच्या सभेच्यावेळी सभागृहामध्ये सत्ताधारी आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. भाजपने तटस्थाची भूमिका घेतली. या साऱ्याचा फटका बसला. भविष्यामध्ये सभागृहातील तांत्रिक पराभव वाचवायचा असेल तर, गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित ठेवताना भाजपची साथ मिळविण्याचा सत्ताधारी आघाडीच्या गटाला प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. मात्र, प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद न केल्याने भाजपचे गोविंद चव्हाण नाराज आहेत.
भाजप नगरसेवकाचे पाठबळ कायम ठेवणार?
वर्षअखेरीला पंचवार्षिक निवडणुकाही होणार आहेत. त्यापूर्वी येत्या काही महिन्यांत पोटनिवडणुका होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकाची नाराजी दूर करून त्याचे पाठबळ कायम ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर ठाकले आहे. त्यामध्ये सत्ताधारी गट यशस्वी होणार का तसेच मागील काही वर्षे सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची जाण ठेवून भाजपची सत्ताधारी गटाला साथ राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माझ्या प्रभाग-1 मधील विकासकामांसाठी तरतुदीसंबंधित कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने अर्थसंकल्प मंजुरीच्यावेळी आपण तटस्थ राहिलो. आपण विकासकामांना प्राधान्य दिले. शहरासह आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सत्ताधारी आघाडीला आपण यापूर्वी साथ दिलेली आहे. अद्यापही आपण आघाडीच्या विरोधात नसून सोबतच आहोत. याचा सत्ताधाऱ्यांकडून भविष्यामध्ये सकारात्मक विचार केला जाईल, ही अपेक्षा.
- गोविंद चव्हाण, भाजपचे नगरसेवक
एक नजर..
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.