
रेल्वेतून २७ लाखांची रोकड चोरणाऱ्यांना अटक
रत्नागिरी: सोने तपासणीचे हॉलमार्क मशिन खरेदीसाठी निघालेल्या व्यापाऱ्यांची २७ लाख ८६ हजार रक्कम असलेली बॅग लांबविणाऱ्या सहा चोरट्यांच्या शहर पोलिसांनी केरळ येथे मुसक्या आवळल्या. हे सर्व चोरटे सांगली जिल्ह्यातील आहेत. शहर पोलिसांनी ३६ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला असून चोरट्यांकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, शहर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. सूरज बाळासाहेब हसबे (वय २२), उमेश वसंत सूर्यगंधा (रा. वाळवा, जि. सांगली), अजय नेताजी शिंदे (२२, रा. खानापूर, सांगली), तुषार किसन शिंदे, यश राजेंद्र वेदपाठक, विकास सुरेश चंदनशिवे (सर्व रा. खानापूर, सांगली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
१ मे रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकातून दोन व्यापारी जामनगर तिरूवल्ली एक्स्प्रेसने केरळला निघाले होते. त्यामध्ये प्रशांत भीमराव माने व रावसाहेब माहीम (दोन्ही रा. सातारा) असे या व्यापाऱ्यांचे नाव आहे. या व्यापाऱ्यांकडील २७ लाख ८६ हजार रुपये रोकड असणारी बॅग रेल्वे प्रवासात अवघ्या १० मिनिटांत चोरीला गेली होती. रेल्वे कणकवलीजवळ आली असता बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याने या व्यापाऱ्यांनी ८ मे रोजी शहर पेालिस ठाण्यात याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी एक विशेष टीम तयार केली. टेक्निकल पुरावे गोळा करून या टीमने थेट केरळ गाठले. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. या प्रकरणी सूरज बाळासाहेब हसबे, उमेश वसंत सूर्यगंधा, अजय नेताजी शिंदे, तुषार किसन शिंदे, यश राजेंद्र वेदपाठक, विकास सुरेश चंदनशिवे या सहा संशयित चोरट्यांना पोलिसांनी केरळमध्ये अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली सर्व रक्कम हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.
Web Title: Railways Cash Thieves Arrested 36 Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..