कुडाळ (सिंधुदुर्ग) : भात नुकसानीपोटी जाहीर केलेले ते सव्वा पाच कोटी रुपये नक्की गेले कुठे? असा सवाल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व माजी कृषी सभापती रणजित देसाई यांनी उपस्थित केला आहे.
देसाई म्हणाले, ‘‘ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्याला अनुसरून तातडीने सर्व नुकसानीचे पंचनामे देखील प्रशासनामार्फत केले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याला भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. या भरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, असे वक्तव्य केले होते; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप एक दमडीही जमा झाली नाही.
हेही वाचा - विनामास्क पर्यटकांना मालवणात दंड
त्यामुळे आधीच वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला भरपाईची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच गेली. प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता हा निधी केवळ गेल्या महिन्यातल्या भरपाईपोटी प्राप्त झालेला नसून गेल्या दोन-तीन वेळच्या भरपाईपोटी प्राप्त झाल्याची माहिती दिली. या निधीच्या वितरणाबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरून कोणतेही निर्देश न आल्यामुळे या भरपाईचे वाटप देखील होऊ शकले नाही. त्यामुळे राज्याला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य नाही हे स्पष्ट झाले आहे.
शासनाने अंत पाहू नये
शासनाने भरपाईपोटी प्रतिगुंठा जाहीर केलेली रक्कम ही मुळातच अत्यंत कमी असून जाहीर केलेली भरपाई देखील शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे शासनाने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अंत पाहू नये. पुढील पाच दिवसांत भरपाई खात्यात जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार, असा इशारा देण्यात आला.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.