Ratnagiri : अनिता ठाकूरदेसाई ठरल्या ‘आधुनिक नवदुर्गा’

भाजपच्या तिकीटावर त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या
kokan
kokansakal

राजापूर : माणूस जन्माला येतानाच त्याच्या मृत्यूची वेळ निश्‍चित असते. मग आजाराला घाबरून जगणं मातीमोल करण्यात काय अर्थ आहे ?’ याच सकारात्मक दृष्टीकोनातून कॅन्सरसारख्या आजारावर मात करीत स्वतः उभ्या राहील्याच. त्याचवेळी सामाजिक जाणीवेतून मनोबल उंचावत इतरांनाही उभे करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. नगरसेविका ते शतकमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या पहिल्या महिला चेअरमन असा प्रवास करीत अनेकांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. एवढेच नव्हे तर, स्वतः कॅन्सरग्रस्त असूनही अध्यात्मिक विषयावर आधारीत किर्तनाच्या माध्यमातून त्या इतरांना सकारात्मक जगण्याची नवी दिशा आणि उर्मी मिळवून देत आहेत. विविध संकटांवर मात करीत इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या किर्तनकार अनिता ठाकूरदेसाई खर्‍या अर्थाने ‘आधुनिक नवदुर्गा’ ठरल्या आहेत.

शहरातील जयराम आणि शांताबाई या प्रसिद्ध ताम्हणकर दाम्पत्याची सौ. ठाकूरदेसाई सुकन्या. पूर्वाश्रमीच्या सुनिता ताम्हणकर असलेल्या सौ. ठाकूरदेसाई यांनी येथील राजापूर हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे द.ज.सरदेशपांडे अध्यापक विद्यालयातून अध्यापक म्हणून पदविका संपादन केली. शालेय शिक्षण घेत असताना नवजात पिढी संस्कारक्षम करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते. त्याच उद्देशाने त्यांनी डि.एड् शिक्षणानंतर शिक्षक म्हणून पेशा स्विकारण्यापूर्वी परिसरातील मुलांची शिकवणी घेण्याला सुरूवात केली.

या दरम्यानच्या प्रवासामध्ये त्यांची अनिल ठाकूरदेसाई यांच्याशी ओळख, मैत्री होती. त्या मैत्रीचे पुढे प्रेमामध्ये रूपांतर होवून त्यांच्यासोबतच त्यांनी पुढे ‘सप्तपदी’ घेतली. घरच्या जबाबदारीमुळे त्यांनी पुढे नोकरीपेशा स्विकारला नाही मात्र, शिकवणी सुरूच ठेवली. उत्तम गृहीणी म्हणून जीवन व्यतित असताना त्यांनी सामाजिक सेवेचा वसा सोडला नाही. भाजपच्या तिकीटावर त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

पुढे नगरसेविका आणि नगर पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबवित महिलांना सक्षम करण्यावर भर दिला. राजापूर अर्बन बँकेच्या पहिल्या महिला चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेताना अनेक कुटुंबांना उभे राहण्यामध्ये मदत केली. या दरम्यानच्या प्रवासामध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. प्रगतशील वैद्यकीय सुविधांमुळे कॅन्सरसारख्या आजारावर मात करणे सहज शक्य आहे. मात्र, या आजाराबाबत समाजामध्ये असलेले समज-गैरसमज आदींमुळे ती व्यक्ती मानसिकरीत्या खचते आणि त्यातच, मृत्यूलाही कवटाळते.

मात्र, या आजारालाही सौ. ठाकूरदेसाई सकारात्मक दृष्टीकोनातून सामोरे गेल्या. शहरातील डॉ. अरूण जोशी आणि डॉ. छाया जोशी या दाम्पत्यासह अध्यात्मिक वाचन, किर्तन यांच्या साथीने त्यांनी या आजारावरही यशस्वीरीत्या मात केली. स्वतः कॅन्सरग्रस्त असूनही अनेक कॅन्सरग्रस्तांशी संवाद साधून त्याद्वारे मनोबल वाढवित आजारावर मात करण्यासाठी त्यांना मदत करताना दिसतात. ‘भारत भोजनालया’च्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

kokan
ग्रामपंचायतीतील वर्चस्व अबाधित ठेवणार का ? पुढाऱ्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी

काही मैत्रिणींच्या साथीने सुरू केलेल्या गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला. कलावती आईंच्या सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीलेले मल्हार कुळकर्णी यांनी केलेले मार्गदर्शन आणि ‘बोधामृत’ या पुस्तक वाचनानंतर त्यांची अध्यात्मामधील रूची वाढली. पुढे वैशंपायन गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली किर्तनकार म्हणून धडे गिरविलेल्या सौ. ठाकूरदेसाई यांनी किर्तन विशारद, भागवत, वासंतिक आदी किर्तनातील विविध पदव्या संपादन केल्या. पुणेसारख्या शहरामध्ये ऐशीहून अधिक किर्तनाचे कार्यक्रम करीत त्याद्वारे त्या समाजप्रबोधन केले आहे अन् करीत आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. मात्र, त्यांच्या पाठीमागे पती अनिल ठाकूरदेसाई आणि सासरे, कुटुंबिय यांच्यासह आई-वडीलांनी केलेले संस्कार यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. या सार्‍या प्रवासामध्ये आलेल्या अनेक संकटांना सामोरे जाताना त्यांनी केलेला यशस्वी प्रवास सार्‍यांसाठी प्रेरणादायी म्हणावा लागेल.

अनिता ठाकूरदेसाई

“ जीवनप्रवासामध्ये अनेक चढ-उतार आले. कॅन्सरसारखा आजारही जडला. मात्र, या सार्‍यावर सकारात्मक मनोबलाच्या जोरावर मात करणे शक्य झाले. हे मनोबल वाढविण्यासह येणार्‍या संकटांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची आणि अन् त्याला सामोरे जाण्याचे अन् जगण्याचे बळ अध्यात्माने मिळवून दिले. जगण्याची नवी उर्मी आणि दिशा अध्यात्माने मिळत असल्याने अध्यात्माची कास धरा अन् जीवनातील संकटाला धैर्याने मात करा. ”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com