
रत्नागिरी : रोजगार निर्मितीने कुटुंब ‘लखपती’
रत्नागिरी: ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक व भूमिहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मग्रारोहयो) मागेल त्याला पाहिजे, ते काम ही संकल्पना राबविली जात आहे. त्यासाठी दशवार्षिक आराखडा बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील दहा गावांची निवड केली असून, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने आराखडा बनविण्याचे कामही चालू केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गावातील प्रत्येक कुटुंबातील पोहोचविणे, प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा विचार करुन वैयक्तिक लाभाच्या कामांची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. गावाचा सर्वांगीण विकास लक्षात घेता, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, जल व मृद संधारण व पायाभूत सुविधांच्या विकासाशी निगडित कामांचा समावेश करणे, कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून त्या माध्यमातून निर्माण होणारे अकुशल व कुशलचे प्रमाण लक्षात घेऊन दहा वर्षांत प्रत्येक कुटुंब लखपती करण्यासाठी नियोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागपूर आयुक्त कार्यालयाकडून कार्यक्रम व्यवस्थापक अमोल शंभरकर व सीमा तकसंडे, निरीक्षक सतीश शेवडे मार्गदर्शन करत आहेत.
जिल्ह्यातील निवडलेल्या प्रत्येक गावात जाऊन मग्रारोहयोची टीम स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या, तेथील रोजगार सेवकांच्या मदतीने घरोघरी सर्व्हे करत आहेत. यामध्ये गावातील लोकांच्या गरजा काय आहेत, गावात कोणते प्रकल्प राबवता येऊ शकतात, याची माहिती घेतली जात आहे. त्या-त्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त असे कोणते काम देता येऊ शकते, यावरही लक्ष टाकले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक व भूमिहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने फक्त मागेल त्याला काम नाही तर पाहिजे ते काम या उत्कीप्रमाणे दशवार्षिक नियोजन केले जात आहे.
१० मेपासून अंमलबजावणी
निवडलेल्या गावातील आराखडे तयार करून त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावयाची आहे. १० मेपर्यंत सर्व गावांमध्ये किमान पाच कामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या आहेत.
१० गावे अशीः
दशवार्षिक आराखड्यासाठी जिल्ह्यातील १० गावे निवडली आहेत. त्यामध्ये गांग्राई (चिपळूण), गावतळे (दापोली), रानवी (गुहागर), भिलाई आयनी (खेड), तळवडे (लांजा), पालघर (मंडणगड), जुवाटी (राजापूर), लाजुळ, वळके (रत्नागिरी), सांगवे (संगमेश्वर) यांचा समावेश आहे.
Web Title: Ratnagiri Job Creation Creates Lakhpati Family
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..