
चिपळूण (रत्नागिरी) : खेर्डी गावच्या सरपंचपदासाठी शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. पहिली अडीच वर्षे शिवसेनेने मागितली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मागणीला कसा प्रतिसाद मिळतो, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
खेर्डी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुखाई पॅनेल विरुद्ध सुखाई परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल दाभोळकर यांनी सुखाई पॅनेलचे नेतृत्व केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जंयद्रथ खताते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई आदींनी सुखाई परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व केले. सुकाई पॅनेलला सहा तर परिवर्तन पॅनेलला ११ जागा मिळाला. जंयद्रथ खताते यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलने पुन्हा ग्रामपंचायत ताब्यात घेतली.
परिवर्तन पॅनेलमध्ये काँग्रेसला १ तर शिवसेनेला ४ चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या. त्यामुळे परिवर्तन पॅनेलमधून राष्ट्रवादीने सरपंचपदासाठी दावा केला आहे. दुसऱ्या बाजूने शिवसेनेकडूनही सरपंचपदाची मागणी सुरू आहे. सरपंचपदावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठका खेर्डीमध्ये सुरू आहेत. खेर्डी गावचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. शिवसेना, राष्ट्रवादीकडे सरपंचपदासाठी उमेदवार तयार आहे. मिळालेली संधी सोडायची नाही, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या भूमिकेवर सर्वकाही अवलंबून आहे.
शिवसेनेची ताकद कमी झाली...
राष्ट्रवादीने शिवसेनेला सरपंचपद न दिल्यास सुखाई पॅनेलचे सदस्य शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी सुखाई पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाची भेटही घेतली आहे. मागील सभागृहात शिवसेनेचे सात ग्रामपंचायत सदस्य होते. आता केवळ चार आहेत. म्हणजेच खेर्डीतील शिवसेनेची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीने खेर्डीवर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलमधील राष्ट्रवादी सरपंचपद आपल्याकडे ठेवून शिवसेनेला उपसरपंचपद देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
"खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही पक्षीय पातळीवर नाही तर पॅनेलच्या पातळीवर लढवली आहे. त्यामुळे आमच्या पॅनेलचा सरपंच होणार हे नक्की. आमच्या पॅनेलचा सरपंच होऊ नये, म्हणून ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले असतील, त्यांनी ते काढावे. कारण देवाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे."
- जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष, खेर्डी
हेही वाचा - कुणाच्याही पायगुणाने परिवर्तन नाही : उदय सामंत
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.