आश्‍वासक सुरवातीनंतर रत्नागिरीत पुन्हा मच्छीचा तुटवडा 

आश्‍वासक सुरवातीनंतर रत्नागिरीत पुन्हा मच्छीचा तुटवडा 

रत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर वातावरणाने साथ दिल्यामुळे मच्छीमार मासेमारीसाठी रवाना झाले. सुरवातीला कोळंबीची लॉटरी लागली, पण पुन्हा पाच वावाच्या पुढे समुद्राच्या पाण्याला ओढ असल्याने छोट्या नौकांद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार बंदरात परतू लागले आहेत. त्यातच म्हाकुळ, तार्ली मिळत नसल्याने मच्छीमार हताश झाले आहेत. विजेच्या प्रखर झोताद्वारे मासेमारीने (एलईडी) ही मासळीच समुद्रातून गायब झाल्याचे मच्छीमारांचे मत आहे. 

बंदी उठूनही एक ऑगस्टपासून मच्छीमारांना समुद्रात जाता आलेले नाही. मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला होता. सुमारे पंधरा दिवस वातावरण खराब होते. नारळी पौर्णिमेनंतर दोन दिवसांनी समुद्र शांत झाला. त्यानंतर नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या. टायनी आणि साळू या प्रकारची कोळंबी मिळत होती.

शुक्रवारपासून (ता. 23) समुद्रातील पाण्याला ओढ लागली आहे. करंट असल्याने होडक्‍याने मासेमारी करणाऱ्यांची अडचण होऊ लागली आहे. कोळंबीला 70 ते 170 रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. पापलेट, हैद, सौंदाळा यासारखी मासळी कमी प्रमाणात मिळत आहे. सुरवातीला मासे मिळत होते; पण निसर्गाचे चक्र फिरल्यामुळे मच्छीमारांचे दिवस फिरले आहेत. 

एकीकडे निसर्गाशी दोन हात करणाऱ्या मच्छीमारांना तांत्रिक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहेत. दोन वर्षे अडचणीचा मुद्दा बनलेल्या एलईडी मासेमारीचा परिणाम समुद्रातील खजिन्यावर जाणवत असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. हंगामाच्या शेवटी एलईडीद्वारे झालेल्या मासेमारीमध्ये म्हाकूळ माशाची अंडी नष्ट झाली आहेत.

परिणामी यंदा हंगामाच्या सुरवातीलाच म्हाकुळ, तार्लीसारखी उत्पन्न देणारी मासळीच गायब आहे. आरंभीला दोन ते तीन टन म्हाकूळ नौकांना मिळायचा, मात्र सध्या दोन ते चार किलो मिळत आहे. यामध्ये छोटे मच्छीमार भरडले जात आहेत. दरम्यान सुरमई, पापलेट यासारखी मासळी सप्टेंबरनंतर मिळेल, असा अंदाज मच्छीमारांचा असून त्यावर सगळे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

पाण्याला ओढ असल्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी नौका गेलेल्या नाहीत. मासळीही थोड्या प्रमाणात मिळत आहे. कासारवेलीतील अनेक नौका किनाऱ्यावरच आहेत.'' 
- अभय लाकडे,
मच्छीमार 

""हंगाम सुरू झाला की तार्ली, म्हाकूळ हे मासे मिळतात. गेल्या दोन वर्षांत ही मासळीच समुद्रात मिळत नाही. याला एलईडीने केली जाणारी मासेमारी जबाबदार आहे.'' 
- आप्पा वांदरकर,
मच्छीमार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com