राजापूर - ज्या शाळेने जग ओळखण्याची आणि जीवन जगण्याचा मार्ग दाखविला त्या शाळेमध्ये कोरोनामुळे ‘क्वारंटाईन’ होण्याची वेळ अनेक गावांमधील माजी विद्यार्थ्यांवर आली आहे. अशाच क्वारंटाईन झालेल्या तालुक्यातील गोवळ येथील माजी विद्यार्थ्यांसह अन्य चाकरमन्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची स्वयंस्फूर्तीने डागडूजी करताना रूपडे पालटून टाकले आहे. अशा पद्धतीने या माजी विद्यार्थ्यांनी क्वारंटाईन कालावधीचा चांगल्या कामासाठी उपयोग करून शिक्षणाचे प्राथमिक धडे दिलेल्या शिक्षण मंदिराचे (शाळा) जणू काही पांग फेडले आहेत.
सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळा नं. 2 च्या आवारातील फुलझाडांना पाणी घालणे, वाढलेल्या गवतासह झाडांची कटींग करून परिसर स्वच्छ आणि सुंदर करणे आदी कामे या क्वारंटाईन कालावधीत माजी विद्यार्थ्यांनी केली आहेत. मुंबईतून आलेल्या गोवळ येथील सुमारे तेवीस लोकांना जिल्हा परिषद शाळा नं. 2 मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईनचा चौदा दिवसांचा कालावधी काही लोकांचा दोन दिवसांमध्ये संपणार आहे. काहींचा क्वारंटाईनचा कालावधी काही दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. ज्या शाळेने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला, त्या शिक्षण मंदिराच्या उपकाराची जणूकाही परतफेड करण्याची संधी क्वारंटाईनमुळे या विद्यार्थ्यांना मिळाली.
फुलझाडांना नियमित पाणी घालण्यासह परिसराची स्वच्छताही त्यांच्याकडून केली जात आहे. इमारतीच्या नादुरुस्त असलेल्या छप्पराची दुरुस्तीही त्यांनी केली. त्यासाठी ग्रामस्थांनी बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले. या सामाजिक बांधिलकीबाबत सरपंच सुनंदा टेंबकर, ग्रामस्थ संजय जाधव, मुख्याध्यापक पारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थांकडून या लोकांचे विशेष कौतुक केले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.