बांदा (सिंधुदुर्ग) : इन्सुली-गावकरवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे आठ एकर बागायती जळून खाक झाली. दुपारी आग लागल्याने सुमारे २०० हून काजू कलमे, आंबा, फणस आदी झाडे जळून सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. अन्यथा शेकडो एकर काजू बागायती जळून खाक झाली असती. महावितरणच्या खांबावरून ठिणगी बागायतीत पडल्याने आग लागल्याची शक्यता आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गावकरवाडी येथील आपट्याचे भरड येथे नाना पाटकर यांच्या काजू बागायतीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ग्रामस्थांनी याची माहिती पाटकर यांना दिली. त्यांनी लागलीच धाव घेत अन्य शेतकऱ्यांना सतर्क केले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र काजू कलमासह अन्य झाडे भक्ष्यस्थानी पडली. पाटकर यांची सुमारे २०० काजू कलमे, विष्णू चराटकर यांची ५० काजू कलमे व आंबे, फणस आदी झाडे जळून खाक झाली.
या जागेतून महावितरणच्या वाहिका गेल्या आहेत.
खांबावरून शॉर्टसर्किट होऊन आग लागली असेल, असा अंदाज आहे. काजू पीक आले असताना तोंडाशी आलेल्या घास आगीने हिरावून घेतल्याने शेतकऱ्याला मदत मिळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. आग विझविण्यासाठी नाना पाटकर, लक्ष्मण चराटकर, महादेव मांजरेकर, आबा सावंत, एकनाथ पोकळे, बाबू मांजरेकर, आनंद चराटकर आदींनी पुढाकार घेतला.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.