
ओरोस: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १७४.३८ टक्के काम केले आहे. तब्बल ७३ कोटी २३ लाख ६८ हजार एवढे कर्ज दोन हजार ९३० बचतगट समूहांना वितरित केले आहे. ही कामगिरी राज्यात तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्वयंसहायता समूहांना विविध बँकांद्वारे पतपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. बँकद्वारे पतपुरवठा करून त्याद्वारे स्वयंसहायता समूहांना विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय उभारून देत त्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून दिली जाते. स्वयंसहायता समूहांना बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्याकरिता दरवर्षी जिल्ह्यांना उद्दिष्ट दिले जाते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील एक लाख ९० हजार १५ स्वयंसहायता समूहांना ३ हजार ६६५ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन हजार ९३० स्वयंसहायता समूहांना ४२ कोटी एवढे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
भौतिक उद्दिष्ट १०६.७६ टक्के
जिल्ह्यात एकूण २ हजार ९३० स्वयंसहायता समूहांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील देवगड ३२०, कुडाळ ४९०, सावंतवाडी ४७५,वेंगुर्ले ३१५, दोडामार्ग २६०, कणकवली ४३५, मालवण ४०५, वैभववाडी २३० अशाप्रकारे आठही तालुक्यांना जिल्हास्तरावर भौतिक उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील देवगड ३०५ (९५.३१ टक्के), कुडाळ ४८४ (९८.७८ टक्के), सावंतवाडी ५२४ (११०.३२ टक्के), वेंगुर्ला ३४५ (१०९.५२ टक्के), दोडामार्ग २९४ (११३.०८ टक्के), कणकवली ५९० (१३५.६३ टक्के), मालवण ३८९ (९६.०५ टक्के), वैभववाडी १९७ (८५.६५ टक्के) अशाप्रकारे तालुकानिहाय भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.
आर्थिक उद्दिष्ट १७४.३८ टक्के साध्य
जिल्ह्याला ४२ कोटी कर्ज वितरित करण्याचे आर्थिक उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने ७३ कोटी २३ लाख ६८ हजार एवढे कर्ज वितरण केले आहे. यामुळे जिल्ह्याचे यावर्षीचे काम १७४.३८ टक्के झाले आहे. हे उद्दिष्ट तालुका निहाय वाटप करण्यात आले होते. त्यात सर्वांनी उद्दिष्टाच्या पुढे जाऊन काम केले आहे. सर्वाधिक कर्ज वितरण कणकवली तालुक्यात २५९.६४ टक्के एवढे झाले आहे. तर सर्वात कमी वैभववाडी तालुक्यात ११०.९४ टक्के काम झाले आहे.
डॉ. वसेकरांकडून कौतुक
उद्दिष्टाच्या १७४.३८ टक्के काम केल्याने उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या राज्य कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक प्रजित नायर यांना अभिनंदन पत्र पाठविले आहे. यात डॉ. वसेकर यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षातील स्वयंसहाय्यता समूहांना बँक पतपुरवठा उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सीईओ नायर, प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार व कर्मचारी हार्दिक अभिनंदन करीत असल्याचे म्हटले आहे. २०२२-२३ चे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल, याचीही खात्री व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला २ हजार ९३० स्वयंसहायता समूहांना ४२ कोटी रुपये एवढे बँक पतपुरवठा करण्याचे राज्य कक्षाकडून प्राप्त झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ३ हजार १२८ बचतगटांना ७३ कोटी २३ लाख ६८ हजार एवढा बँक पतपुरवठा करीत उद्दिष्टाच्या १७४.३८ टक्के काम केले आहे. त्यामुळे जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले. जिल्ह्यातील बँकांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे हे यश मिळाले.’’
- राजेंद्र पराडकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.