सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला

राज घराण्यातील गादीसाठीचा संघर्ष टोकाला गेला. यातून काही अप्रिय घटनाही घडल्या.
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला

सिंधुदुर्ग : खेम सावंत तिसरे यांच्या निधनानंतर राज्याचा कारभार बर्‍याच प्रमाणात अस्थिर झाला. राज घराण्यातील गादीसाठीचा संघर्ष टोकाला गेला. यातून काही अप्रिय घटनाही घडल्या; मात्र खेम सावंत तिसरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि दुर्गाबाई यांनी या संघर्षाच्या काळातही सक्षमपणे कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

खेम सावंत तिसरे यांना पुत्रसंतान नव्हते. त्यांनी आपल्या शेवटच्या काळात सत्तेची सुत्र आपल्या जेष्ठ पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दिली. त्यांच्या पश्‍चात प्रधान विष्णू कामत यांच्या मदतीने लक्ष्मीबाई करभार पाहू लागल्या. यानंतर राज गादीसाठीचा अंतर्गत संघर्ष सुरू झाला. राज घराण्यातील सदस्य असलेले सोम सावंत उर्फ आबासाहेब आणि श्रीराम सावंत उर्फ रावसाहेब या दोघांनाही आपलाच मुलगा गादीवर यावा असे वाटत होते. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आपापल्या मुलाला दत्तक घेण्यासाठी लक्ष्मीबाईंकडे दोघांनीही आग्रह धरला; मात्र त्या यासाठी तयार होईना. हा संघर्ष अखेर टोकाला गेला.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला
कृष्णेत सापडला उपद्रवी आणि घातक असा मासा

सोम सावंत यांनी खेम सावंत तिसरे यांच्या दोन्ही पत्नी लक्ष्मीबाई आणि दुर्गाबाई यांना कैद करण्याची योजना आखली. आपला मुलगा फोंडसावंत यांना यासाठी सैन्य जमा करायला रेडीच्या यशवंतगडावर पाठवले. आपण या दोन्ही स्त्री उभयतांना कैद करू आणि त्याचवेळी फोंडसावंत बाहेरून सैन्याची मदत आणतील अशी ही योजना होती. ठरलेल्या दिवशी आबासाहेबांनी आपल्या विश्‍वासातील सैनीकांच्या मदतीने राजवाडा हस्तगत केला; मात्र यशवंतगडावरून अपेक्षीत असलेली सैन्य मदत वेळेत पोहोचलीच नाही.

याचदरम्यान श्रीराम सावंत उर्फ रावसाहेब बाहेरगावी गेले होते. त्यांच्यासोबतही सैन्य होते. त्यांना हा प्रकार कळला. ते तातडीने सावंतवाडीतील जुन्या कोटात दाखल झाले. संधी बघून त्यांनी राजवाड्याच्या परिसरात असलेल्या सोम सावंतांच्या सैन्य तुकडीवर अचानक हल्ला केला. यात ते सैन्य विखुरले गेले. रावसाहेबांनी राजवाड्यावर आपला पहारा बसवला. इकडे आपण राजवाडा आधी हस्तगत केल्यामुळे लक्ष्मीबाई आपले म्हणणे मान्य करतील असे सोम सावंत यांना वाटले होते. पण तसे झाले नाही. रावसाहेबांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सोमसावंतच आपल्या कुटुंबासह आत अडकले. यात स्वतः सोमसावंत त्यांच्या पत्नी जयवंतीबाई, मुलगा जयराम उर्फ बाबासाहेब, मुलीचा मुलगा बाबुराव घाटगे आणि इतर काही चाकरांचा समावेश होता. त्यांना सुटून जाण्याचा कोणताच मार्ग दिसला नाही. त्यांनी अखेर मृत्यूचा मार्ग कवटाळला.

राजवाड्यात असलेली दारूची बॅरल उध्वस्त करून त्याला आग लावून त्यांनी हा नाश ओढवून घेतला. १६ एप्रिल १८०४ ला घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सोमसावंत यांचे पूर्ण कुटुंब व इतर मिळून १८ जणांचे निधन झाल्याचे संदर्भ मिळतात. यावेळी सोमसावंत यांचा रेडी येथे मदत आणण्यासाठी गेलेला मुलगा फोंड सावंत हे मात्र यातून बचावले. या घटनेनंतर लक्ष्मीबाई आपले म्हणणे मान्य करतील आणि आपल्या मुलाला गादीवर बसवतील अशी आशा रावसाहेबांना होती; मात्र ती सफल होईना. इकडे सोमसावंत यांचे पूत्र फोंड सावंत यांना रावसाहेब यांच्यावर सुड उगवायचा होता. त्यासाठी ते कोल्हापूरच्या छत्रपतींकडे मदत मागायला गेले. छत्रपतींनी मदत द्यायचे कबुल करून त्यांच्यासोबत आपले सरदार रत्नाकर आपा राजाज्ञ यांना पाठवले. ते प्रथम मालवण आणि तिथून रेडीच्या यशवंतगडावर आले. तेथे यशवंतगडाच्या बंदोबस्तासाठी रत्नाकर आपा यांनी आपले काही लोक ठेवले व कोल्हापुराला परतले. पावसाळ्यानंतर कोल्हापूर सरकारकडून सैन्य मदत देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला
माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!

पुढे पावसाळा संपताच रत्नाकर आपा फौज घेवून घाट उतरून खाली आले. त्यांनी नरसिंहगड, भरतगड व निवती हे किल्ले घेतले. सावंतवाडी संस्थानच्या मुलखात धुडगूस सुरू केला. शेवटी लक्ष्मीबाई यांनी फोंड सावंत यांना त्यांच्या वडीलांचे सर्व हक्क देण्याचे कबुल करून सावंतवाडीत परत आले. यानंतर रत्नाकर आपा आपले सैन्य घेवून घाट चढून कोल्हापूरला परतले. या घटनेमुळे फोंड सावंत यांचे राजकीय वजन वाढले. साहजीकच रावसाहेबांना राजधानी सोडून जावे लागले. ते आपल्या तुकडीसह बांद्याच्या बाजूने गेले. तेथे बांदा कोट, हनुमंतगड यावर आपली सत्ता स्थापन केली. यातील बांदा कोटावर चंद्रोबा आणि हनुमंतगडावर जैतोबा यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. याला शह देण्यासाठी लक्ष्मीबाईंनी सैन्य जमवले. हे सैन्य घेवून राणी दुर्गाबाई, जानराव निंबाळकर व दुसरे मुख्य सरदार यांच्यासह फोंड सावंत रावसाहेबांनी ताब्यात घेतलेल्या मुलखात घुसले; मात्र रावसाहेबांनी पाचशे जणांच्या फौजेसह त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. हा प्रकार १८०५ मध्ये घडला. यात फोंड सावंत यांच्या सैन्याला पराभव पत्कारावा लागला.

फोंड सावंत कसेबसे यातून सुटून आकेरीत पळाले. राणी दुर्गाबाई, जानराव निंबाळकर व इतर सरदार रावसाहेबांच्या हाती लागले. त्यांना फुकेरीच्या हनुमंतगड येथे ठेवण्याचे आदेश रावसाहेबांनी दिली. त्यानंतर ते मोठ्या थाटात सावंतवाडीत परतले. रावसाहेबांनी सावंतवाडीत आल्यावर लक्ष्मीबाईंना आपला मुलगा रामचंद्र उर्फ भाऊसाहेब यांना दत्तक देवून त्याला गादीचा अधिकारी करण्यास भाग पाडले. हा समारंभ १८०५ मध्ये मोठ्या थाटात झाला. यावेळी हनुमंतगड येथे नेवून ठेवलेल्या राणी दुर्गाबाई यांनाही समारंभाला उपस्थितीसाठी मोकळीक देण्यात आली. त्यामुळे त्याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

अंतर्गत कलहाचा असा झाला तोटा

राजघराण्यातील अंतर्गत कलहामुळे कारभारावर काही प्रमाणात अस्थिरता होती. यामुळे खजिनाही रिता होवू लागला होता. याचा परिणाम म्हणून किल्ल्यांवरील सैनिकांचे व इतरांचे पगार थकले होते. ही संधी पेशव्यांच्या अमलाखाली असलेल्या साळशी महालाचे अमंलदार चिटकोपंत यांनी हेरली. यातील साळशी महालामध्ये अर्धा महसूल सावंतवाडीकरांना मिळायचा. राजश्रींच्या कारकीर्दीत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे ही वसुली राहून गेली. पुढे सगळाच महसूल पेशवे वसूल करू लागले. याचेच अमंलदार असलेल्या चिटकोपंत यांनी सिदगडावरील शिपायांना पैसे देवून त्यांचे मन वळवले आणि हा किल्ला विना लढाईत आपल्या ताब्यात घेतला. पुढे हा किल्ला आपल्याकडे मिळवण्याचे फारसे प्रयत्न सावंतवाडी संस्थानकडून झाले नाही.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला
PHOTO - 'या' पदार्थांना पुन्हा गरम करुन खात असाल तर सावधान!

संस्थानचे सिंहासन

सावंतवाडी संस्थानच्या राजगादीची स्थापना झाली तेव्हा त्याचे स्वरूप मखमली कापड आणि दोन बाजूला दोन मखमली कापडाने सजवलेले लोड असे होते. त्याकाळात अस्थिरता असायची. राजगादीचे संरक्षण याला विशेष महत्त्व असायचे. त्यामुळे युध्दकाळात असे स्वरूप ठेवल्याने ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणे सोपे जायचे. पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज यांच्या कार्यकाळापर्यंत गादीचे स्वरूप असेच होते. पुढे १३ मे १९४७ ला श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या राज्याभिषेकावेळी तत्कालीन राजमाता पार्वतीदेवीसाहेब यांनी चांदीचे सिंहासन बनवून घेतले. आजही हे सिंहासन राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पहायला मिळते. याच्या मागच्या बाजूस सूर्याचे चित्र कोरलेले आहे. त्याखाली फणाधारी दोन नागांची चित्रे आहेत. नागदेवतेच्या खाली चिलखत कोरलेले असून ते क्षात्रतेजाचे प्रतिक मानले जाते. त्याखाली जहाज कोरले असून ते आरमाराचे प्रतिक आहे. शेजारी घोडदळाचेही प्रतिक कोरलेले असून ‘जय शंभो’ अशी अक्षरेही कोरली आहेत. सिंहासनाच्या दोन्ही हातावर सिंह कोरलेले आहेत. पाय ठेवण्यासाठी स्वतंत्र चांदीचा मंचक आहे. सिंहासनाची उंची सहा फुटापेक्षा जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com