माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!

माऊलीचं छत्र हरपल्यानंतर बापानेच दिली आईची माया
माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!

सांगली : दीर्घ काळाच्या आजारानं आईनं जगाचा निरोप घेतला. ती आम्हां तिघा भावंडाना कायमच सोडून गेली. आई गेली तेव्हा मी दहावीत शिकत होतो. दोन लहान बहिणी आणि मी, मग आई-वडील अशा दोन्ही भूमिका वडिलांनी निभावल्या. आई असताना बाबांचा जबरदस्त दरारा होता. कडक स्वभाव, भरभक्कम आवाज, काटेकोर शिस्तबद्धता अशी त्यांची गुणवैशिष्ट्य. पण आई गेली आणि आमचा बापच आमची माऊली झाला. ममतेचा पाझर फुटवा तसा तळहाताच्या फोडाप्रमाणं त्यांनी आम्हाला जपलं आणि लहानाचं मोठं केलं. सांगली जिल्ह्यातील एरंडोली गावचे प्रसाद कोष्टी आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त करत होते.

1992 ला अचानक आमच्यातून आई निघून गेली. तिचा आजार न बरा होणाराच होता. परंतु अशा परिस्थितीतही वडिलांनी हार मानली नाही. एक ना दोन कित्येक दवाखाने त्यांनी पालथे घातले. आईच्या आजारपणासाठी त्यांनी हर एक इलाज केला. (special story of father's day) अनेक डॉक्टर्स, उपाय, औषधं असं शक्य तेवढं अजामावलं. पण नियतील हे प्रयत्न तोकडे वाटले असावेत. तिने आईला हिरावून घेतले. सुखी संसाराचा गाडा ओढायला नवरा बायको रुपी दोन चाक असावी लागतात, अस म्हंटल जात. (father's day) पण यातलं एक जरी चाक निखळलं तरी तो गाडा डगमगू लागतो. पण वडिलांची मानसिकता आणि इच्छाशक्ती इतकी प्रबळ आणि दाट होती की आईच्या माघारी त्यांनी फुलाप्रमाणे आमचा तिघा भावंडांचा सांभाळ केला. (father's day 2021)

माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!
Father's Day : सद्‍गुणांची खाण, घराण्याची शान, बाप आमचा महान!

माझे वडील शिव्वापा कोष्टी 75 वर्षाचे आहेत. पण अजूनही त्यांचा तोच बाणा आणि कणा दिसून येतो. शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना विद्युत महामंडळात नोकरी मिळाली. त्यांचे लग्न झाले आणि संसाराचा प्रवास सुरु झाला. कांता आणि शिवाप्पा कोष्टी यांच्या संसाररूपी वेलीला तीन फुलांनी जन्म घेतला. पण वेल बहरत असतानाच ती दुर्दैवाने खुडली गेली. म्हणून त्यातल्या एका भक्कम वलीने लेकरांचा सांभाळ केला.

वडिलांनी कधीच कोणत्या गोष्टींसाठी आम्हाला माघार घेण्यास प्रवृत्त केले नाही. कोणत्याच गोष्टीला कधी बंधने नव्हती. मात्र एखादी गोष्ट, एखादं काम हाती घेतलं तर पूर्णत्वाला न्यायचं असा त्यांचा अठ्ठहास असतो. आपलं काम मन लावून प्रामाणिकपणे करावं अशी सोपी शिकवण आजही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्हाला उपयोगी पडते. माझं शिक्षण, लहान बहिणीचं शिक्षण, लग्न नोकरी अशी सगळी जबाबदारी त्यांनी अगदी नियोजित पद्धतीने पार पाडली.

कडक स्वभावाचे शिस्तप्रिय माझे वडिल आईच्या जाण्याने मात्र शांत झाले. माझ्या लेकरांवर मी चिडलो तर त्यांच्यावर माया कोण करणार? या एका सवालाने ते अनेकदा अस्वस्थ होत असावेत. कारण त्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल होत गेला. ते अधिकचं शांत आणि संयमी झाले. आदरयुक्त भीती मनात होतीच परंतु कधीच त्यांची कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही.

माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!
Father's Day : ‘प्रियंका’ करणार ऑलिंपिकमध्ये देशाचे नेतृत्व

माझ्या आयुष्यातील एक किस्सा म्हणजे माझं सरकारी नोकरीसाठी सिलेक्शन झालं आणि मला पुण्याला ट्रेनिंगसाठी जावं लागलं होतं. पण काही कारणास्तव माझं मन तिथे रमेना म्हणून मी घाबरतचं वडिलांना फोन केला. परंतु कोणताही वाद न घालता ते एकच वाक्य बोलंले, 'तुला जमत नसेल तर तू घरी ये, आपण इथे काहीतर पाहूया.' त्यांच्या त्या खंबीर शब्दांनी मला नव्यानं उभारण्याची संधी दिली. मग पुणे सोडले आणि थेट घर गाठलं. पण एखादी गोष्ट नशीबातच असते. सांगलीत राहूनच मला पुन्हा एकदा सरकारी खात्यातच नोकरी मिळाली. त्यावेळी वडिलांच्या चेहऱ्यावर जे काही समाधान, आनंद होता त्याचं मोजमाप कशातचं नव्हतं.

दोन्ही मुलींची लागोपाठ शिक्षण आणि लग्न झाली. माझंही लग्न झालं. नातवंड लेकरं यांनी घरकुल पुन्हा गोकुळात नांदलं. माझ्या वडिलांना कीर्तन, भजन करायची प्रचंड आवड. नोकरीत असताना या साऱ्या गोष्टींकड दुर्लक्ष व्हायचं. परंतु निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचा बराच वेळ वारकरी सांप्रदायसाठी दिला. घरी सांप्रदायचा वारसा असल्यानं विठ्ठल, तुकोबा, ज्ञानोबा यांचे नाव प्रत्येकाच्या मुखी असते. काका, आजोबा विठू माऊलीचे निस्सीम भक्त. आता ही परंपरा पुढे वडिलांनी सुरु ठेवली आहे. इतकंच नाही तर आता ते नातवालाही परंपरा सूरु ठेवण्याठी मार्गदर्शन करत आहेत.

अगदी सुरुवातीपासून घरी कोणताही महत्वाचा निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाने घेतला जातो आजही ती परंपरा कायम आहे. आमच्यावर संस्कार, करिअर, शिक्षण या कोणत्याच गोष्टीत त्यांचे निर्णय कधीच चुकले नाहीत. अगदी जनेरेशन गॅप वैगेरे सर्व गोष्टींना फाटा देत त्यांनी सगळं कसं परफेक्ट मेंटेन केलय. नातवंडाच्या बाबतीही ही जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. सामाजिक वसा आणि वारसा दोन्ही जपणारे. सढळ हाताने मदत करणारे. अजूनही त्याच उमेदीने शेतीत रमणारे, घाम गाळत काळ्या मातीत सोनं पिकवणारे, कोणत्याही निर्णयात कधीच हिरमुस न करणारे. शब्दरूपी प्रगल्भ अभ्यासाच भांडार म्हणजे आमचे वडिल.

माझी माऊली कायमची गेली अन् 'बाप'च आम्हा भावंडांची 'आई' बनला!
Father's Day: सोनू सूदने मुलाला भेट दिली महागडी कार? व्हिडीओ व्हायरल

आई विषयी खूप लिहल, बोललं जातं. आई नेहमी सोबत असतेच. वडील आणि लेकरांत संवादरुपी साकव म्हणून भूमिका निभावते. वडील मात्र नेहमीच या सर्वांपासून मागे असतात. लेकीला सासरी घालवताना असुदे किंवा मग तिला बोर्ड पेपरला चांगले मार्क मिळाले म्हणून ऑफिसमध्ये गपचूप पेढे वाटणे असुदे. वडिलांची भूमिका नेहमीच पडद्याआड राहिली आहे. आईनंतर माउलीरुपी वडिलांनी काय हवं, नको ते दिलं आहे. फुलाप्रमाणं धक्का न लागू देता जपलं आहे. साथीनं, सोबतीन कधी आई तर कधी बाप अशी पाठराखण केली आहे. असं जरी असल तरी आई किंवा बाप या दोघांपैकी एकाच्या प्रेमाला मुकलेला व्यक्ती संवेदनशील आणि संवादरुपी शांतच होतो इतकं नक्की..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com