सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीवरील इंग्रजांचे संकट

अर्थात या प्रतिकूल स्थितीलाही सावंतवाडीकरांनी खंबीरपणे तोंड दिले
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीवरील इंग्रजांचे संकट

सिंधुदुर्ग : तिसरे खेम सावंत (राजश्री) यांच्या कारकिर्दीत अनेक लढाया झाल्या. यात इंग्रजांनी (british) केलेला सावंतवाडी (sawantwadi) संस्थानवरील हल्ला नुकसानकारक ठरला. तसेच किनारपट्टीवरील साम्राज्याला काहीसा धक्‍का देणारा ठरला. अर्थात या प्रतिकूल स्थितीलाही सावंतवाडीकरांनी खंबीरपणे तोंड दिले.

सावंतवाडीकरांची आरमारी ताकद इंग्रजांच्या डोळ्यात खुपत होती. व्यापार हा त्यांचा मुख्य हेतू होता. जलमार्गसाठी (sea rout) निर्धोक असणे गरजेचे होते; मात्र इंग्रजांच्या अरबी समुद्रातून (arbiyan sea) जाणाऱ्या गलबतांना सावंतवाडीकरांचा उपद्रव होत असे. यामुळे सावंतवाडीकर इंग्रजांच्या शत्रूंच्या यादीत होते. सावंतवाडीकरांना शह देण्यासाठी मुंबईतील इंग्रज सरकारने हल्ल्याची योजना बनवली. मेजर गोर्डन (major gardon) आणि कॅप्टन वॉटस्‌न (captain watson) यांच्या नेतृत्वाखालील सैन्यावर ही जबाबदारी देण्यात आली. हे सैन्य ६ मार्च १७६५ ला रेडी (reddy) येथे पोहोचले आणि त्यांनी तिथल्या यशवंतगडाला वेढा दिला. सावंतवाडीचे मुख्य प्रधान जीवाजी विश्राम सबनीस यांनी याला उत्तर देण्याची योजना आखली. रात्रीच्या वेळी अचानक इंग्रज सैन्यावर छापा टाकावा, अशी त्यांची योजना होती. यासाठी त्यांनी सैन्याची जमवाजमव सुरू केली; मात्र यशवंतगडावर संरक्षणाच्या दृष्टीने फारशी तयारी नव्हती. याचा फायदा घेवून इंग्रजांनी सावंतवाडीकरांचे सैन्य पोहोचण्या आधीच ९ मार्च १७६५ ला यशवंतगड ताब्यात घेतला. इंग्रजांनी या किल्ल्याला ‘फोर्ड आगस्टस', असे नाव दिले.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीवरील इंग्रजांचे संकट
चिपळुणात विनाहेल्मेट फिरणाऱ्या 275 चालकांवर कारवाई

या सगळ्या घडामोडीत सावंतवाडीकरांच्या रणनितीमध्ये समन्वयाचा अभावही दिसला. कारण रेडीत पोहोचण्यापूर्वी इंग्रजांनी आपले काही सैन्य सिंधुदुर्ग, सर्जेकोट आणि राजकोट या किल्ल्यावर ठेवले होते. मसुऱ्याच्या भरतगड किल्ल्यावरील किल्लेदार विश्राम नरहर यांनी इंग्रजांचे रेडी किल्ल्यावरील लक्ष विचलित करण्याची योजना आखली होती. दुसरे एक सरदार भानशेट भोगटे यांच्या मदतीने पाच-सातशे सैन्य जमा करून राजकोट व सर्जेकोट येथील इंग्रज सैन्यावर हल्ला करण्याचे ठरवले होते. तसे झाले असते तर इंग्रज आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी रेडीचा किल्ला सोडून मागे आले असते; मात्र सावंतवाडीतून आधीच रेडीकडे रवाना व्हायचा निरोप मिळाल्याने भोगटे आपल्या सैन्यासह रेडीकडे रवाना झाले होते. साहजिकच भरतगड किल्लेदारांचा बेत प्रत्यक्षात आला नाही.

यशवंतगड (yashwant gad) हा आरमारी हालचाली व किनारपट्टीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. त्यावरील ताबा इंग्रजांकडे गेल्यावर सावंतवाडीकरांनी तहाची बोलणी सुरू केली; मात्र इंग्रजांनी मोठी अट घातली. मालवणपासून (malvan) रांगणागडापर्यंतचा मुलुख आपल्याला द्यावा आणि सावंतवाडीकरांच्या आरमारातील सर्व लढावू गलबते इंग्रजांच्या ताब्यात घ्यावी अशी ती अट होती. सावंतवाडीकर ते कबुल करेनात. दबाव वाढवण्यासाठी इंग्रजांनी १३ मार्च १७६५ला आपले सैन्य मसुरेच्या भरतगडाच्या दिशेने रवाना केले. अखेर सावंतवाडीकरांना इंग्रजांची अट मान्य करावी लागली.

रेडी येथे ७ एप्रिल १७६५ ला दोन्ही पक्षांमध्ये तह झाला. यात असे ठरले की, सावंतवाडीकरांनी आपली दोन माणसे स्वखर्चाने मुंबईत इंग्रजांकडे ठेवावी. साळशीची खाडी ते कर्लीची खाडी पर्यंत घाटमाथा ते किनाऱ्यापर्यंतचा मुलुख इंग्रजांना द्यावा. सिंधुदुर्ग किल्ला प्रभाव क्षेत्रातील कर्ली नदीच्या पलिकडच्या गावांचा तनखा सावंतवाडीकरांनी घ्यावा. लढाईच्या खर्चाबद्दल एक लाख रुपये सावंतवाडीकरांनी इंग्रजांना द्यावे. यातील निम्मी रक्‍कम आठ दिवसांत देवून उरलेली हप्त्याने द्यावी. सावंतवाडीकरांनी आपल्या मुलुखात इंग्रजांना वखारी बांधायला जागा द्यावी.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीवरील इंग्रजांचे संकट
'म्युकोरोमायकॉसिस' झाल्यास काय काळजी घ्याल? केंद्रानं सांगितलं

इंग्रज किंवा पोर्तुगीज (portuguese) यांच्या व्यतीरीक्‍त इतर कोणत्याही युरोपियनांना या भागात व्यापाराला परवानगी देवू नये. भोसल्यांनी आरमार ठेवू नये. सावंतवाडीकरांनी भरतगड इंग्रजांना द्यावा. कोणत्याही युरोपियनाला आपल्या नोकरीत ठेवू नये. सावंतवाडीकरांना दारूगोळा व इतर लढाईसाठीचे साहित्य इंग्रजांनी माफक दरात पुरवावे. याच्या पुर्ततेनंतर इंग्रजांनी रेडीचा किल्ला सावंतवाडीकरांना परत द्यावा, अशा अटी ठरल्या. सावंतवाडीकरांनी पुढे हा तह पाळला नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सरकारने टामस मास्टीन या अधिकाऱ्याला सर्व अधिकार देवून पाठवले. त्याने २४ ऑक्‍टोबर १७६५ मध्ये रेडी येथे सावंतवाडीकरांसोबत पुन्हा तह केला. त्यात जुन्या एप्रिलमध्ये झालेल्या तहात ठरलेला मुलुख, भरतगड किल्ला इंग्रजांना देण्याचे आणि आरमार न ठेवण्याचे कलम रद्द केले; मात्र बाकी अटी तशाच ठेवल्या; मात्र यात आणखी काही अटी वाढवल्या. यात लढाईच्या खर्चापोटी एकूण दोन लाख इंग्रजांना द्यावे. त्यापैकी ८० हजार तहाच्या तारखेपासून तीन महिन्यात द्यावे.

बाकी दरवर्षी ६० हजार याप्रमाणे दोन वर्षात फेडावे. या रकमेच्या फेडीसाठी जामिन म्हणून विठोजी कामत यांनी राहावे. कामत यांच्याबद्दल खात्रीसाठी शिवराम जीवाजी सबनीस आणि सेनापती दौलत दळवी भोसले यांनी स्वखर्चाने मुंबईला रहावे. पुढच्या १३ वर्षांपर्यंत वेंगुर्ले वसुलीसाठी इंग्रजांच्या ताब्यात द्यावा. वेंगुर्लेत ब्रिटीशांचा बावटा लावावा. पाहिल्या हप्त्याची फेड झाल्यावर ब्रिटीश सरकारने रेडीचा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात द्यावा. पुढे मात्र हा तहही पाळला गेला नाही. इंग्रजांनी ओलीस ठेवायला सोबत नेलेली सावंतवाडीतील माणसे पुढे पळून आली. इंग्रजांनी नेमलेले लोक वेंगुर्लेत वसुलीसाठी येवू लागले; मात्र सावंतवाडीकरांच्या लोकांनी त्यांना अटकाव केला. हा सगळा घटनाक्रम १७७१ मध्ये घडला. ठरलेला रकमेची वसुली मात्र सुरू होती. सहा वर्षांत सावंतवाडीकरांनी इंग्रजांना एकूण ४५ हजार रूपये दिले. वेंगुर्लेचा किल्ला गहाणदाराकडे ठेवला होता. तहात ठरलेली १३ वर्षे पूर्ण झाल्यावर सावंतवाडीकरांनी तो परत मागीतला; मात्र तहान ठरलेली सगळी रक्‍कम वसुल न झाल्यामुळे तो किल्ला परत देईना. तेव्हा १७८० मध्ये वेंगुर्लेवर हल्ला करत सावंतवाडीकरांनी पुन्हा ताबा मिळवला.

मराठ्यांशी जिव्हाळा

सावंतवाडी संस्थानचे छत्रपती आणि पेशव्यांशी संबंध चढ उताराचे राहिले. असे असले तरी सावंतवाडीकरांचे मराठ्यांशी असलेले नाते जिव्हाळ्याचे होते. १७६३ मधील घटना हेच अधोरेखीत करते. त्या काळात मराठ्यांनी चीनमधील पोर्तुगीजांचे ठाणे असलेल्या मकाव येथून येणारे पोर्तुगीजांचे एक जहाज पकडले. यामुळे मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी पोर्तुगीजांनी सौंद्याचा राजा आणि सावंतवाडीकरांकडे मदत मागितली. सौंद्याच्या राजाने १० हजार सैनिक द्यायचे कबुल केले; मात्र सावंतवाडीकरांना मराठ्यांविरूद्ध मदत देणे पटेना. त्यामुळे ते तटस्थ राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com