मच्छीमारांचे पॅकअप: समुद्रातील पाण्याला करंट

मच्छीमारांचे पॅकअप: समुद्रातील पाण्याला करंट

रत्नागिरी: तौक्‍ते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) सरल्यानंतरही समुद्रातील पाण्याला अजूनही करंट असल्यामुळे हंगामच्या अखेरीस मच्छीमारांची (Fisherman)निराशाच सुरू आहे. पावसाचे संकेत मिळाले की मासळी किनाऱ्याकडे येऊ लागते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात थोडी फार मासळी जाळ्यात सापडते; मात्र यंदा वादळाने त्यावर पाणी फेरले आहे. (tauktae-cyclone-impact-on-fishermen-fishing-kokan-news)

शासनाच्या निकषानुसार कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ३१ मे रोजी बंद होणार आहे. तत्पूर्वी मे महिन्यात १७ तारखेला तौक्‍ते चक्रीवादळ धडकले आणि मासेमारीवर संक्रात आली. वादळात हानी होऊ नये, यासाठी मच्छीमारांना आधीच सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चार दिवस मासेमारी पूर्ण बंद होती. त्यानंतर काही मच्छीमारांनी अखेरच्या टप्प्यात मासा मिळेल, या आशेने खोल समुद्र गाठला. त्यांच्या हाती अपेक्षित मासळीच सापडली नाही.

वादळानंतर पुन्हा वातावरण बदलत राहील, या शक्‍यतेने साठ टक्‍केहून अधिक मच्छीमारांनी नौका जेटीवर काढण्यास सुरवात केली होती. मिरकरवाडा बंदरातील दहा टक्‍केच मच्छीमार समुद्रात जात आहेत. त्यांना साधारण वीस किलो बांगडा, वीस किलो लालबी यासह फिशिंगच्या नौकांना १० ते २५ किलो चिंगळं मिळत आहेत. समुद्रात ये-जा करण्यासह खलाशांचा खर्चही त्यातून भागत नसल्याचे समोर आले आहे.

पाणी अस्थिर; पाहिजे तशी मासळी नाही

वादळामुळे समुद्र खवळलेला असून मासे खोल पाण्याच्या दिशेने गेले आहेत. "यास' वादळाचा तडाखा बसणार नसला तरीही समुद्रातील पाण्याला करंट आहे. पाणी स्थिर नसल्यामुळे पाहिजे तशी मासळी मिळत नाही, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. यंदाचा हंगाम मच्छीमारांसाठी यथातथाच गेला आहे. गतवर्षी पाऊस लांबल्यामुळे सुरवात उशिराने झाली. अधुनमधून पावसाळी वातावरणाने मच्छीमारांचा हिरमोड झाला आहे. मासेमारी हंगाम संपुष्टात येण्यासाठी चारच दिवस शिल्लक आहेत. यामध्ये काहीतरी हाती लागेल. अशी आशा घेऊन समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांच्या पदरी निराशा आली आहे.

मच्छीमारांसाठी यंदाचे वर्ष निराशेचे गेले. कोरोनातील निर्बधांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात तौक्‍ते चक्रीवादळाने मच्छीमारांची निराशा केली. शेवटच्या टप्प्यातील मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फेरले.

-पुष्कर भुते, मच्छीमार

एक नजर..

किनारपट्टीवरील मासेमारी ३१ मे रोजी बंद होणार

तौक्‍तेमुळे चार दिवस मासेमारी होती पूर्ण बंद

मिरकरवाडातील दहा टक्‍केच मच्छीमार समुद्रात

खलाशांचा खर्चही त्यातून भागत नसल्याचे स्पष्ट

हंगाम संपुष्टात येण्यासाठी चारच दिवस शिल्लक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com