रत्नागिरी सोडणारे शिक्षकच जास्त; काय होतील परिणाम? वाचा...

Teacher transfer process ratnagiri district
Teacher transfer process ratnagiri district

रत्नागिरी - आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यांत जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची यादी जाहीर झाली. त्यात सोलापूर, नंदुरबार, धुळे, सातारा या जिल्ह्यांत जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्या पाठोपाठ अन्य जिल्ह्यांचा समावेश असेल. या प्राथमिक शिक्षकांना सोडण्याचा निर्णय झाला तर त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षक संख्येवर होणार आहे. शिक्षक भरतीतील स्थानिकांचा टक्‍का वाढविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची भरतीची प्रक्रिया काही वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर होत होती. त्यानंतर ही प्रक्रिया राज्यस्तरावरून राबविण्यात येऊ लागली. शिक्षक भरतीसाठी आवश्‍यक असलेली गुणवत्ता स्थानिक उमेदवारांमध्ये असूनही अनेकांना यात संधीच मिळत नाही. परजिल्ह्यांतील शिक्षकांची नियुक्‍ती झाली की ते काही वर्षांनंतर पुन्हा गावाकडे जाण्यास सज्ज होतात. टाळेबंदीपूर्वी सरल पोर्टलवरून राज्यातील रिक्‍त पदांवर शिक्षकांची भरती झाली. त्यात अन्य जिल्ह्यांतून नियुक्‍त झालेल्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.

शासननियमानुसार तीन वर्षांनतर आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित व्यक्‍ती पात्र ठरते. बहुतांश शिक्षक तीन वर्षे रडतखडत काम करतात आणि त्यानंतर आपल्या घराजवळ जाण्यासाठी खटपट करतात. आंतरजिल्हा बदलीवरून दरवर्षी जिल्ह्यात वादंग निर्माण होतो. जिल्ह्यातून जाणाऱ्या मराठी माध्यमातील 324 शिक्षकांमध्ये सोलापूरला सर्वाधिक शिक्षक जाणारे आहेत. त्यापाठोपाठ धुळे, नंदुरबार, सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्‍त अन्य जिल्ह्यांत जाणारेही अधिक शिक्षक असून, उस्मानाबाद, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जालना, नगर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांत जाणाऱ्या शिक्षकांचेही प्रमाण अधिक आहे. 

शिक्षक समितीच्या भूमिकेकडे लक्ष 
शाळांची पदे रिक्‍त राहणार असतील तर शिक्षकांना सोडणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी घेतली होती. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या गुरुवारी (ता. 13) होणाऱ्या बैठकीत शिक्षक बदल्यांविषयी कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोकणात नोकरीला यायचे आणि काही वर्षांनंतर बदली करून निघून जायचे, अशी वस्तुस्थिती मागील 10 ते 12 वर्षांपासून आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- संदीप गराटे, अध्यक्ष, कोकण डी.एड.- बी.एड.धारक संघटना 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com