रत्नागिरीत उच्चांकी तापमान, हंगामातील पहिली नोंद ; झळांचा हापूसवर परिणाम

temperature increases in konkan effects on mango crop in ratnagiri
temperature increases in konkan effects on mango crop in ratnagiri

रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्यामुळे उकाडा वाढला असून, थंडी कमी होत आहे. या परिस्थितीत अचानक उष्णतेची लाट निर्माण झाल्याने रविवारी (ता. २८) रत्नागिरीत ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. यंदाची ही उच्चांकी नोंद असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. एका दिवसात साडेतीन अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना दिवसभर कडक उन्हाचे चटके सहन करावे लागले.

रविवारी सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला. घराबाहेर पडल्यानंतरही अंगाची लाहीलाही होत होती. दुपारच्या सुमारास शहरात शुकशुकाट होता. उन्हाचा तडाखा सायंकाळी चार वाजेपर्यंत होता. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ही नोंद यंदाच्या हंगामातील उच्चांकी ठरली आहे. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळांना 
सुरवात होते.

रत्नागिरीत ३७.७ अंश उच्चांकी तापमान

 यंदा फेब्रुवारीअखेरीस ही नोंद झाली. मागील चार-पाच दिवसांतील तापमान ३४ अंशापर्यंत होते. एका दिवसात साडेतीन अंशांनी त्यात वाढ झाली. तसेच किमान तापमान २१ अंश सेल्सिअस होते. कमाल आणि किमान तापमानातील फरक साडेसोळा अंशाचा आहे. या बदलांचा परिणाम कोकणातील हापूसवर होणार आहे. मोठ्याप्रमाणात फळगळीची शक्‍यता आहे.

यंदा मोसमी पाऊस लांबला आणि ऋतू चक्राचा फेरा चुकला. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने थंडीचा हंगामही पुढे गेला. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे म्हणावी तशी थंडीही पडली नाही. मिनी महाबळेश्‍वर दापोली तालुक्‍यातही किमान तापमान १० अंशापर्यंत खाली गेले होते. ती नोंदही एखादाच दिवस आणि तीही एक महसुली मंडळापुर्तीच होती. हवामानातील हे चढ-उतार मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. सध्या दिवसा कडकडीत उन आणि सायंकाळी थंडी या वातावरणाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

- २३ ते २८ फेब्रुवारी या कालावधीतील तापमान

 तारीख     कमाल     किमान

  •  २३       ३४        २५
  •  २४       ३४        २५
  •  २५       ३४        २३
  •  २६       ३२        २३
  •  २७       ३२        २२
  •  २८       ३७.७      २१

"वातावरणात चढ-उतार होत राहतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. उच्चांकी तापमानामुळे तयार झालेला आंबा भाजेल आणि सुपारीएवढी कैरीचे गळ होऊ शकते."

- डॉ. विवेक भिडे, बागायतदार 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com