बदला घेण्यासाठी सात जणांची हत्या
एकाच कुटुंबातील सातजणांची
बदला घेण्यासाठीच हत्या
नातेवाईकांपैकी पाच भावडांचे कृत्य
केडगाव (जि. पुणे), ता. २५ : पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदी पात्रात मृतावस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नसून, त्यांचा खून केल्याचे उघड झाले. मृतांचे नातेवाईक असलेल्या पाच सख्या भावंडांनी बदला घेण्यासाठी हत्याकांड केले आहे. संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
भीमा नदी पात्रात बुधवारपासून (ता. १८) टप्प्याटप्याने सात मृतदेह आढळून आले होते. सातही जण एकाच कुटुंबातील होते. काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या नसून, खून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी विविध ठिकाणांवरून संशयितांना ताब्यात घेतले आहे. अशोक कल्याण पवार (वय ६९), श्याम कल्याण पवार (३५), शंकर कल्याण पवार (३७), प्रकाश कल्याण पवार (२४) व त्यांची बहिण कांताबाई सर्जेराव जाधव (४५, सर्व रा. ढवळेमळा, निघोज, ता. पारनेर, जि. नगर) आदींचा त्यात समावेश आहे. ना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यवत (ता. दौंड) येथे पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मोहन उत्तम पवार (४५), संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडित फुलवरे (२८), राणी श्याम फुलवरे (२४), रितेश ऊर्फ भय्या (७), छोटू श्याम फुलवरे (५), कृष्णा श्याम फुलवरे (३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. मोहन पवार हे शाम फुलवरे यांचे सासरे आहेत. अनैतिक संबंध किंवा अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. संशयित व मृत मोहन पवार चुलत भाऊ आहेत. पवार व फुलवरे दाम्पत्यांचा यवत येथे मंगळवारी अंत्यविधी करण्यात आला.
या गुन्ह्यात आणखी संशयित मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आणखी काही उद्देश आहे का, कट कसा रचला, कुठे रचला याबाबत आम्ही तपास करत आहे, अशी माहिती अंकित गोयल यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस पुढील तपास करत आहे.
हत्याकाडांमागचे कारण
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित व खून झालेले सर्वजण निघोज येथे राहत होते. तेथे ते मजुरी करत. संशयित अशोक पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली (ता. हवेली) येथे अपघातात मृत्यू झाला होता. त्याला मोहन पवार व त्याचा मुलगा अनिल कारणीभूत असल्याचा संशय आरोपींना होता. धनंजय याच्या मृत्यूचा राग आरोपींच्या डोक्यात होता. या कारणावरून सूड घेण्याच्या उद्देशाने मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.