रत्नागिरी-मांडवी बंदरातील गाळाबाबत फेब्रुवारीत बैठक
मांडवी बंदरातील गाळाबाबत फेब्रुवारीत बैठक
बोटी बाहेर काढण्यात अडचण ; मच्छीमारांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा
रत्नागिरी, ता. १२ ः भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे जैसे थे आहे. याबाबत जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने पालकमंत्री उदय सामंत यांची बुधवारी (ता. ११) पाली येथे भेट घेतली. पालकमंत्र्यांनी हा गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मेरिटाईम बोर्डाबरोबर फेब्रुवारीमध्ये मुंबईत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. मुंबईतील बैठकीला मच्छीमार संघर्ष समितीचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
शहराजवळील राजिवडास, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांना या गाळाची समस्या जाणवत आहे. समुद्रात ये-जा करण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी जेटीसमोरून जाणारा एकमेव मार्ग आहे; परंतु हा मार्ग गाळाने भरलेला असतानाच मोठमोठे खडकही येथे आहेत. त्यामुळे हा मार्ग मच्छीमारांसाठी धोकादायक ठरत आहे. हा गाळ उपसण्यात यावा, अशी मागील २० ते २५ वर्षापासून मच्छीमारांची मागणी आहे; मात्र, शासनाकडून याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. मच्छीमार संघर्ष समिती ही गाळ उपशासाठी लढत आहे. त्यासाठी वेळोवेळी शासनदरबारी निवेदने देण्यात आली. त्यानंतर मेरीटाईम बोर्ड, पत्तन विभाग आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांकडून या गाळाची पाहणीही करण्यात आली. हा गाळ लवकरात लवकर उपसून पुढील मासेमारी मोसमात तरी हा मार्ग मोकळा मिळेल, अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाली येथे चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.