सुगंध, सुवास.... अर्थ देईल उद्योगास

सुगंध, सुवास.... अर्थ देईल उद्योगास

Published on

rat२४१३.txt

(११ जानेवारी टुडे पान तीन)

( टुडे पान ३)

धरू कास उद्योजकतेची ...........लोगो

rat२४p८.jpg ः
७७९४१
प्रसाद अरविंद जोग

कोकणातला पानाफुलातला हा सुवास, सुगंध जरा जास्तच खास आहे. तो आपल्याला स्वत:च्या प्रॉडक्टमध्ये, ब्रँडमध्ये उतरवता यायला हवा असा विचार फारच थोड्या उद्योजकांनी केला असणार. म्हणून कोकणात रॉ मटेरियल असून ही कमर्शिअल प्रोजेक्ट्स आले नसावेत किंवा माहिती असूनही ते तंत्र योग्यरित्या त्यांना गवसले नसावे असेच म्हणावे लागेल. सुगंध, सुवास, Fragrance आपल्याला नवा उत्साह देतात. त्याला मोठी बाजारपेठ आहे. केवडा, गुलाब, बकूळ, सुरंगी, कुडा ही सारी फुले सुवासिक...सगळी कोकणातलीच; पण त्या सुवासालाही मर्यादा असल्याने तो सुगंध कुपी बंद, बाटली बंद करून रसिकांना त्यांच्या गरजेनुसार, इच्छेनुसार वापरता द्यायला यायला हवा म्हणून अनेक छोटे-मोठे, सफल-असफल प्रयत्न सुगंधी अर्क, तेल बनवणाऱ्यांकडून केले गेले. काहींनी त्याचे कारखाने बनवले. काहींची सुगंधाशी केमिस्ट्री जुळली तर काहींची बिघडली.

- प्रसाद जोग, चिपळूण
--

सुगंध, सुवास.... अर्थ देईल उद्योगास

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारा, भुरळ घालणारा सुवास इथल्या लाल मातीत, माठातल्या थंड वाळामिश्रित पाण्यात, चहात घातल्या जाणाऱ्या गवती चहाच्या पातीत, केसात माळल्या जाणाऱ्या मोगऱ्यात, देवाला अर्पण केलेल्या जाणाऱ्या बकुळ, सोनचाफा या फुलात असतो. कोणताही चांगला वास आपले ध्यान, आपले लक्ष आकर्षून घेत असतो. आपली पंचेद्रिये विविध द्रव्यांची, गंधांची आपल्याला आपल्या कळत नकळतपणे आठवण करून देत असतात. काही सुवास, सुगंध तर स्वर्गीय सुख देणारे, मन प्रफुल्लित करणारे असतात.
आंबा, काजू यांच्या मोहरणीच्यावेळी येणारा मोहोराचा सुवास, हळदीच्या पानांचा सुवास, आंबेमोहोर भाताचा सुवास, देवळात पुजेसाठी उगाळलेल्या चंदनाचा सुवास, स्वयंपाक घरातील केशराचा सुवास, चुलीवर कढवल्या जाणाऱ्या गाईच्या लोणकढ्या तुपाचा वास, परसात फुलणाऱ्या रातराणी, प्राजक्ताचा, जाईजुईचा सुवास आपल्याला एक वेगळा रम्य गंधानुभव देतो. कोकणातील मातीत वाढणाऱ्या प्रत्येक पाना-फुलाचा स्वतःचा असा गंध आहे. सुगंध आहे. सुगंध माणसाचे मन प्रसन्न करतो. चित्तवृत्ती स्थिर करतो. सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतो. सुगंध नेहमीच लक्षवेधक व दुसऱ्यांना मोहक वाटणारा असतो; आकर्षक असतो.
सुगंध ही जशी अनुभूती आहे तशीच ती फार पूर्वीपासून माणसाची गरज आहे आणि उद्योजकतेचे साधे सूत्र या फ्रॅग्रंस इंडस्ट्रीलाही तंतोतंत लागू पडल्याचे आपल्याला दिसून येईल. इत्र, अत्तर, सुगंधी द्रव्ये यांना फार पूर्वीपासून मोठी मागणी असायची. सुगंधी द्रव्ये त्या वेळी सुगंधी वनस्पती, फुले यांचा अर्क नैसर्गिक पद्धतीने काढून व त्यात कोणतीही केमिकल्स/रसायने न घालता बनवली जायची. मुघल, इंग्रज, पोर्तुगीज या आपल्यावर राज्य करणाऱ्या राजवटींनी आपली अत्तरे, सुगंधी द्रव्ये अगदी सातासमुद्रापार पोहचवली होती. त्या वेळी आपली बंदरे समृद्ध होती. व्यापारउदिम समुद्रमार्गे चालत असल्याने शिशी, कुपीमधून हा सुगंध दूर देशापर्यंत पोहचत होता. याचा अर्थ आपल्या कडे असणारं सुगंध बनवण्याच कसब, ज्ञान, फॉर्म्युले हेरून परकीय व्यापारी स्वतःचा व्यापार, उद्यम वाढवत होते. कोस्टलसाईटला अर्थात समुद्र किनारपट्टीवरील त्या वेळी होणाऱ्या व्यापारात काही सुगंधांचे आदान-प्रदान झाले असावे व प्राचीन संस्कृती स्वातंत्र्योत्तर काळातही शाश्वतपणे टिकून राहिली असावी असे वाटते; पण काही अपवाद वगळले तर सुगंधी वस्तू, सेंट, परफ्यूमद्वारे अर्थनिर्मिती होऊ शकते याचा मोठ्या प्रमाणात कोणी विचार केला नसावा. म्हणून पर्यटकांना, सुगंधी प्रेमींना, रसिकांना हा कोकणातील सुवासरूपी ठेवा वस्तुरूपाने घरी घेऊन जाता येत नव्हता.
मुलुंडची गोविंद केळकर यांची केळकर फर्म मोठे व्हिजन घेऊन या इंडस्ट्रीत स्वतःचे नाव अग्रणी ठेवून आहे. या इंडस्ट्रीत येण्यासाठी सातत्याने शिकण्याची, प्रयोगशीलतेची, नाविन्याची व संयमाची गरज आहे. तसेच रसिकांची अभिरूची जाणून घेऊन तसे सुगंध बनवण्याची आवश्यकता आहे. जे सुगंध ग्राहकांना आध्यात्मिक, मानसिक, भावनिक, आनंदी सुगंधी अशी तरल भावना, संवेदना व जाणीव देऊ शकतील. आपल्या ग्राहकांची दिवसाची सुरवात प्रसन्न करून त्यांना positive vibes देऊ शकतील.
आज आपण संकटातून संधी शोधून स्वतःचा कोस्टल वाईब्ज हा अस्सल कोकणचा सुगंध देणाऱ्या ब्रॅण्डची निर्मिती करणाऱ्या दापोली, मुर्डी येथील श्री. व सौ. जोशी यांच्या उद्योजकीय प्रवासाची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निसर्गाशी असलेली नाळ निसर्ग वादळानंतरसुद्धा तुटू न देता कोकणातील पारंपरिक फुलांचा सुगंध सर्वदूर पोचावा म्हणून उद्योजकतेची कास धरणाऱ्या जोशी दाम्पत्याची कथा प्रेरक व रोचक आहे. मैत्रेयी जोशी या उद्योजिकेने या परफ्यूम विषयाचा अगदी बारकाईने अभ्यास केला असून, प्रॉडक्ट पॅकेजिंग, फ्रॅग्रन्स डिझायनिंगकडे त्या स्वतः लक्ष देतात तर वि. वि. जोशी हे दापोली कृषी विद्यापीठाचे स्नातक असल्याने ते प्रोडक्शन आणि आर अँड डीचे काम बघतात. त्यांच्याशी झालेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना जोशी म्हणाल्या, वादळाने झालेलं नुकसान आणि गेल्या काही वर्षात मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित कारणांनी आंब्याचं बेभरवशी उत्पन्न आणि त्यामुळे संबंधित अन्य व्यवसायांवर होणारे परिणाम पाहता अन्य पर्याय शोधणं आवश्यक होतं. अशाच वेळी कोकणातली विविध सुगंधी फुलं आणि वनस्पती खुणावत होत्या. कोकणातल्या फळांबरोबरच इथले अप्रतिम सुगंध जगापर्यंत पोचवण्याची एक संधी म्हणून या उद्योग पर्यायाचा विचार करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर श्री. व सौ. जोशी यांनी कोस्टल वाईब्ज हा स्वतःचा ब्रॅण्ड नावारूपाला आणला.
सध्या ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या या प्रोडक्ट्सना समाजातल्या सर्व स्तरांमधून आणि सर्व वयोगटांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळत असून, मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. यामुळे आपण केलेली निवड व घेतलेला निर्णय योग्य होता असे त्यांना वाटते. कोणत्याही तांत्रिक सल्लागाराची मदत न घेता मोठा कन्सल्टन्सी सपोर्ट न घेता मुर्डी, दापोलीसारख्या ग्रामीण भागातून उद्योजकीय प्रेरणेने प्रेरित होऊन स्वतःचा सुगंधी व्यवसाय उभारणाऱ्या या उद्यमी दाम्पत्याचा, सुगंधी व्यवसाय सुरू करण्याची एक कल्पना ते ब्रँड बनण्याचा आठ महिन्यांचा प्रवास कोकणातील नवउद्योजकांसाठी नवचैतन्य निर्माण करणारा व दिशादर्शक ठरणारा आहे. शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते फुलाला सुगंध मातीचा आपणही कित्ता गिरवू उद्योजकतेचा...सुगंध पसरो सर्वदूर या कोस्टल Vibes चा.....

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com