
आचरा उर्दू कथामालेचे कार्य स्तुत्य
swt३०२५.jpg
79317
अणदूर-उस्मानाबादः आचरा उर्दू कथामालेचा गौरव करताना मान्यवर.
आचरा उर्दू कथामालेचे कार्य स्तुत्य
शामराव कराळेः उस्मानाबाद येथे अधिवेशनात गौरव
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ३०ः जिल्हा परिषद आचरा उर्दू शाळेची कथामाला गेले अर्धशतक साने कथामालेचे कार्य प्रेरणादायी करीत आहे. या शाळेतील मुलांचे, पालकांचे, शिक्षकांचे कथामालेविषयी असलेले प्रेम आणि योगदान भारतातील सर्व कथामालांना प्रेरणादायी ठरेल. साने गुरुजींना अपेक्षित असे कार्य या कथामालेने केले आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे अध्यक्ष शामराव कराळे यांनी केले. अणदूर-उस्मानाबाद येथे आयोजित कथामालेच्या ५५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
कथामालेचे ५५ वे राष्ट्रीय अधिवेशन शिक्षण महर्षी सी. ना. आतुरे गुरुजी नगरी, जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदूर-तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे झाले. यावेळी सत्कार समारंभाच्या वेळी कराळे बोलत होते. यावेळी आचरा उर्दू शाळेला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते पन्नालाल खुराणा, कथामाला कार्यवाह सुधीर पुजारी, कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री मधुकरराव चौधरी आदी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते. हा पुरस्कार आचरे उर्दू शाळेचे शिक्षक आफताब पटेल, सय्यद मुसा, मुख्याध्यापक निसार सोलकर, विद्यार्थी प्रमुख मुहम्मद सय्यद यांनी स्वीकारला. त्यांच्या सोबत रामचंद्र कुबल, दत्ताराम सावंत, समीर आचरेकर, रामकृष्ण रेवडेकर, रामचंद्र वालावलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मालवण कथामालेच्या मार्गदर्शनाखाली आचरा उर्दू माध्यमाच्या कथामालेने यशस्वीपणे पार केलेल्या सुवर्ण महोत्सवी कथामाला कार्याचा हा पुरस्कार आहे, असे गौरवोद्गार उर्दू कथामालेचे अभिनंदन करताना मालवण कथामालेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले.