
राजापूर-खासदार राऊतांकडून उद्योगमंत्री सामंतांची नाहक बदमानी
खासदारांकडून सामंतांची नाहक बदमानी
अशफाक हाजू ; वारिशे मृत्यूप्रकरणात राजकारण करू नये
राजापूर, ता. १२ः पत्रकार शशिकांत वारीशे यांचा ज्या प्रकारे अपघात होऊन मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुदैवी आहे. मात्र पत्रकार वारीशे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे उद्योगमंत्री उदय सामंत व या प्रकरणातील संशयित पंढरीनाथ आंबेरकर याचा जुना फोटो शेअर करत सामंत यांची नाहक बदनामी करत आहेत. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.
वारीशेच्या मृत्यूला राजकीय रंग देऊन खासदार राऊत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका बाळासाहेब शिवसेनेचे राजापूर तालुकाध्यक्ष अशफाक हाजू यांनी केली. श्री. हाजू म्हणाले, ‘वारीशे यांचा झालेला मृत्यू हा घातपात असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाडी चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आजपर्यत रिफायनरी प्रकल्पाचे राजकारण करून पोळी भाजणारे खासदार राऊत हे आता वारीशे यांच्या मृत्यूचेही राजकारण करू पाहात आहेत. मंत्री, खासदार, आमदार यांना दररोज शेकडो लोक भेटत असतात, फोटो काढत असतात. पण खासदार राऊत यांना हे माहिती नसावे हे दुदैव. त्यांच्यासोबत असलेले फोटोही आमच्याकडे आहेत, पण आम्ही असे घाणेरडे राजकारण करणार नाही.