
खासदार राऊतांकडून राजकीय भांडवल
rat१३४०.txt
( पान ३ साठी)
खासदार राऊतांकडून वारीशेंच्या मृत्यूचे राजकीय भांडवल
रवींद्र नागरेकर ; उठसुठ राणेंचे नाव घेऊन नाहक बदनामी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ : शिवसेना खासदार विनायक राऊत हे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वारीशे मृत्यूच्या निषेधाच्या मोर्चात याप्रकरणी अटकेत असलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर याच्याशी राणे यांचे संबध जोडून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याची टीका भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी केली आहे.
घडलेली घटना ही निषेधार्थ असून त्याचा आम्ही निषेधच करतो. मात्र उठसुठ राणेंचे नाव घेऊन नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी रिफायनरी विरोधकांनी नुकताच निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हजेरी लावून खासदार राऊत यांनी राणे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्याचा खरपूस समाचार नागरेकर यांनी घेतला आहे.
नागरेकर म्हणाले, पंढरीनाथ आंबेरकर हा यापूर्वी खासदार राऊत यांनाही अनेकदा भेटलेला आहे. शिवाय तुमचे सरकार असताना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही भेटलेला आहे. आंबेरकर हा आपणाला अनेकवेळा राजापूरात शासकीय विश्रामगृहावर भेटला. अनेक कार्यक्रमातही भेटला याचा तुम्हाला आता सोयीस्कर विसर पडला की काय? विनायक राऊत यांना आता त्यांच्या पक्षात कोणतीच किंमत राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपली ही निरर्थक बडबड थांबवावी. खासदार म्हणून मतदारसंघात आपण काय दिवे लावले हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मात्र न बोलावताही अशा मोर्चा व अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहून वायफळ बडबड करण्याचे काम विनायक राऊत करत आहेत अशी टीकाही नागरेकर यांनी केली.