
अपूर्ण रस्ता पूर्ण करा, अन्यथा उपोषण
85898
वागदे : मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण कामामुळे वारंवार अपघात होत आहेत. या प्रकरणी वागदे सरपंच संदीप सावंत यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
अपूर्ण रस्ता पूर्ण करा, अन्यथा उपोषण
वागदे सरपंचांचा इशारा; वारंवार अपघातामुळे संताप
कणकवली, ता.२८ : मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पूल ते गोपुरी आश्रम या दरम्यान उभादेव मंदिरासमोरील दीडशे मिटर लांबीची मार्गिका अपूर्ण स्थितीत आहे. या मार्गिकेचे काम आठ दिवसांत पूर्ण न केल्यास उपोषणाला बसू, असा इशारा वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिला आहे.
श्री.सावंत म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले; मात्र उभादेव मंदिरासमोरील मार्गिका अजूनही पूर्ण केलेली नाही. महामार्गावर वेगाने वाहने जात असतात. यात अचानक अपूर्ण स्थितीतील रस्ता दिसल्यानंतर वाहन चालकांचा गोंधळ होतो. तर पुढील वाहनाने वेग कमी केल्याचा अंदाज मागील वाहन चालकाला येत नाही. त्यामुळे मागील वाहन पुढे जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात होत आहेत. तसेच भरधाव जाणाऱ्या वाहनांचे या अपूर्ण मार्गिकेवर आल्यानंतर नियंत्रण कोलमडते, त्यामुळे देखील वारंवार अपघात होत आहेत. महामार्ग विभागाने पुढील आठ दिवसांत येथील रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा वागदे ग्रामस्थांसह येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सरपंच श्री.सावंत यांनी दिला. दरम्यान, या प्रश्नाबाबत आमदार नीतेश राणे यांचेही आपण लक्ष वेधले असल्याचे ते म्हणाले.