
राजापूर-दुचाकी बिबट्यावर सोडली अन गडग्यावरून मारली उडी
-rat2p36.jpg
86450
राजापूर ः बिबट्याचा वावर असलेला रस्ता आणि परिसर.
-ra2p37.jpg
86451
दीपाली पंडित
दुचाकी बिबट्यावर सोडली, अन् गडग्यावरून मारली उडी!
दीपाली पंडित ः काही क्षणांच्या झटापटीचा भयप्रद, थरारक अनुभव घेतला
राजापूर, ता. २ ः रात्री नऊ-सव्वानऊ वाजलेले... दुचाकीवरून जात असताना अचानक बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. हातावर बिबट्याचा पंजा लागला. त्यानंतरही गाडी पुढे तशीच पळवली... बिबट्याने काही वेळ पाठलाग केला. आरडाओरडा...हॉर्न वाजवणे अन् गाडी मोठ्याने रेस केल्यावरही तो बिचकला नाही. पाठलाग करतच राहिला मागचापुढचा विचार न करता स्वतःला वाचवण्यासाठी बिबट्याच्या अंगावर तशीच गाडी सोडली अन् लगतच्या गडग्यावरून खाली उडी मारली... तेव्हा दगड लागून डोक्याला दुखापत झाली. त्या स्थितीतच कार्यालयाशी अन् वनविभागाशी संपर्क साधला. सुमारे पाच-दहा मिनिटांची बिबट्यासोबत झालेली झटापट अंगावर आताही काटा आणतो... निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित सांगत होत्या.
लोकवस्तीचे ठिकाण असले तरी ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्या परिसरामध्ये त्यावेळी काळोख असल्याने बिबट्याने केलेला हल्ला समजू शकला नाही. बिबट्याच्या हल्ल्यांची माहिती देणाऱ्या घटनांचे अनेक व्हिडिओ यापूर्वी आपण पाहिलेले असून, त्या व्हिडिओंमधून मिळालेली माहिती हल्लेखोर बिबट्याशी दोन हात करण्यास उपयुक्त ठरली, असेही त्यांनी सांगितले
शहरातील भटाळीकडून पुढे पोलिस लाईनकडून जाणाऱ्या कोदवली रस्त्यावर पंडित यांच्यावर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पंडित यांच्यावर आधी राजापूर रुग्णालय आणि त्यानंतर रत्नागिरी येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. प्रकृती चांगली असल्याने त्यांना रत्नागिरीतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थरार कथन केला...
पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी जात असताना पोलिसलाईनच्या थोडे पुढे आल्यानंतर बिबट्याने अचानक आपल्यावर हल्ला केला. बिबट्याशी झटापट झाल्यानंतरही धीर राखू शकले. हल्ला करणारा बिबट्या नेमका कुठे गेला हे काळोखामुळे समजू शकले नाही. काही काळ जणू शुद्ध हरपल्यासारखे झाले. वेळीच मदत केल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, असे सांगत भर लोकवस्तीमध्ये हल्ला करणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या उपाययोजना वनविभागाने कराव्यात, अशी मागणीही पंडित यांनी केली आहे.