
कळणेतील नुकसानग्रस्तांना न्याय कधी मिळणार?
कळणेतील नुकसानग्रस्तांना
न्याय कधी मिळणार?
अभय देसाई; जिल्हा प्रशासनावर आरोप
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ९ ः कळणे मायनिंग दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी आवाज उठवूनही जिल्हा प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे, असा आरोप मनसे माजी विभागीय अध्यक्ष अभय देसाई यांनी केला.
याबाबत श्री. देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कळणे मायनिंगचा मानवनिर्मित बंधारा २९ जुलै २०२१ ला सकाळी ७.३० वाजता कोसळला होता. त्यातील साठलेली खनिज मिश्रित माती पाण्याच्या प्रचंड लोटाबरोबर कळणे-धवडकीवाडीवरील वस्तीत व शेतकऱ्यांच्या जमिनीत घुसली होती. यात घरे, भातशेती, फळबाग लागवड, विहिरी, शेततळी, नळयोजना, नदीपात्र यांचे अतोनात नुकसान झालेले होते. तसेच साग, फणस व इतर जंगली झाडेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर उन्मळून पडली होती. खनिज युक्त माती शेतजमिनीत साचल्याने सुपीक जमिनी नापीक बनून आता ओसाड व पडीक झाल्या आहेत. या दुर्घटनेला तब्बल दोन वर्षे पूर्ण होणार आहेत; परंतु शेतकऱ्याला अद्यापही न्याय मिळाला नाही. न्याय मिळेल या आशेवर हतबल शेतकरी असहाय्य जीणे जगत आहेत. उपोषणे, आंदोलने, तिरडी आंदोलने करण्यात आली; मात्र झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन जागे होत नाही. शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी यात नमूद केला आहे.