
अवकाळी पावसाने आंबा मोहराची फळधारणा कठीण
अवकाळीने आंबा फळधारणेत खो
दापोली तालुक्यात फटका ; हातातोंडाशी आलेल्या घासावर पाणी
दाभोळ, ता. ९ : दापोलीत नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून त्याचा परिणाम आंबा पिकावर होणार आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे आंब्यावर मोहोर दिसेल, पण फळधारणा होणार नाही. नुसताच मोहोर खराब होऊन जाईल. सध्या वातावरणातील बदल हे फळधारणेला हानीकारक आहेत.
डिसेंबर महिन्यापासून आंबा काजू फळ पिक बागांची काळजी घेत बागायतदारांनी हजारो रूपये खर्च करत महागडी औषधे वापरून फवारण्या केल्या होत्या. वन्य प्राण्यांच्या उपद्रवाला तोंड देण्यासाठी कुंपण आणि राखणींवर खर्च केला. त्यामुळे आंबा काजूंचे मोहर टिकून फळधारणा शक्य झाली. मेहनत व कष्टाने जपलेल्या बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने निसटण्याची शक्यता निर्माण झाली असून आर्थिक नुकसानीच्या धास्तीने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
दापोली तालूक्यातील आंबवली बुद्रुक येथील आंबा बागायतदार मनोज केळकर म्हणाले दापोली तालूक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या परिस्थितीत आंब्यावर मोहोर दिसेल, पण फळधारणा होणार नाही. नुसताच मोहोर खराब होऊन जाईल. सध्या वातावरणातील बदल हे फळधारणेला हानीकारक असून त्याचा थेट परिणाम हा बागायतदारांच्या आर्थिक उत्पन्नावर होणार आहे.
हवामानाचा फटका
कोकणात दोन दिवस हलक्या स्वरुपात अवकाळी पाऊस पडला आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विदयापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हवेत उष्माही वाढलेला होता. या वाढलेल्या उष्म्याचा परिणाम अवकाळी पावसात झाला.या पावसाचा फटका आंबा ,काजू, फणस या फळ पिकाला तर बसणार आहेच शिवाय पावटा, चवळी , कुळीथ आदी रब्बी हंगामातील पिकावरही याचा परिणाम होणार आहे.