
खेड-प्रसिद्ध उदोजक सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
प्रसिद्ध उद्योजक सदानंद कदम यांना अटक
ईडीची कारवाई; साई रिसॉर्ट प्रकरणाची चौकशी; उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
खेड, मुंबई ता. १० ः साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आज अटक केली. खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. साई रिसॉर्ट प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेत आहोत असे ईडीकडून स्पष्ट केले गेले आहे
ईडीची टीम त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली आहे. दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. ईडीने त्यांना ताब्यात घेतल्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असं अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याप्रकरणात आता सदानंद कदम यांची चौकशी सुरू झाली. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.
संजय कदम यांची
शिंदे गट, भाजपवर टीका
दापोली येथील साई रिसॉर्टवर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने झाली आहे, धमकाविण्याचे काम राज्य सरकार करीत असून शिंदे गटाचे काही नेते सूडबुद्धीने कारवाई घडून आणण्याचे काम करीत आहेत. सांगत नव्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी निषेध केला आहे. ५ मार्चला उद्धव ठाकरे यांची खेड शहरात गोळीबार मैदानात सभा झाली होती या वेळी या सभेसाठी उद्योजक सदानंद कदम यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सदानंद कदम यांची साई रिसॉर्टवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. या सगळ्या घडामोडीनंतर सदानंद कदम यांच्यावर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. सदानंद कदम खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेच्या तयारीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. सभेच्या तयारीसाठी अनिल परब यांच्यासह सदानंद कदमही यांचाही सहभाग होता.
योगेश कदम यांनी आरोप फेटाळले
उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेचे यशस्वी आयोजन केल्यामुळे सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई झाली, हा आरोप योगेश कदमांनी फेटाळून लावला. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी सांगली आणि कऱ्हाडमधून लोकं आणण्यात आली होती. राजन साळवी आणि वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील लोकं आणली होती; पण या सगळ्याने काही फरक पडणार नाही, हे आम्ही अगोदरच सांगितले आहे. उद्धव ठाकरेंची सभा मोठी झाली म्हणून सदानंद कदम यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यांची चौकशी वर्षभरापासून सुरू होती. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत, असे योगेश कदम यांनी म्हटले.