रत्नागिरीतील एकतर्फी कामाकाजावरून हल्लाबोल

रत्नागिरीतील एकतर्फी कामाकाजावरून हल्लाबोल

९४८८४


पान १ साठी

रत्नागिरी ः शहरातील रखडलेल्या विविध प्रश्‍नांबाबत पालिका प्रशासकांना जाब विचारताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.


एकतर्फी कामकाजावरून हल्लाबोल
रत्नागिरीतील विविध प्रश्‍न; ठाकरे गट, राष्ट्रवादी धडकले पालिकेवर; विचारला जाब
रत्नागिरी, ता. १० ः शहरातील ठरावीक प्रभागातील रखडलेली विकासकामे, सातत्याने फुटणारी नवीन पाईपलाईन, कचऱ्‍याचा गंभीर प्रश्‍न, नव्याने होऊ घातलेले काँक्रिटचे रस्ते या विषयावरून महाविकास आघाडीतील ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आज पालिकेवर धडकले आणि मुख्याधिकाऱ्‍यांना जाब विचारला.
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशिर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नीलेश भोसले, ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहर संघटक व तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, संजू साळवी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकाऱ्‍यांनी सोमवारी सकाळी एकतर्फी कामाकाजावरून हल्लाबोल करत पालिकेवर अचानक धडक दिली. या वेळी प्रशासक तुषार बाबर यांची भेट घेऊन शहरात सध्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
शहरातील काही प्रभागांमध्ये विकासकामे निधी मंजूर होऊन रखडली आहेत. या कामाची निविदा रद्द झाल्यामुळे निधीही परत गेला. कुणाच्या सांगण्यावरून हे काम रखडवण्यात आले, असा प्रश्‍न या वेळी पदाधिकाऱ्यांनी केला. माजी नगरसेवकांच्या घराबाहेरील कचरा वेळेत काढला जातो; परंतु काही प्रभागातील रस्त्यावरील कचराच अनेक दिवस उचलला जात नाही, असा आरोप बंड्या साळवी यांनी केला. मिरकरवाडा जेटीजवळील सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह बंद असल्याने, स्थानिक मच्छीमार महिलांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेली सहा महिने पाठपुरावा करूनही त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रशिदा गोदड यांनी केला. हे प्रसाधनगृह व शौचालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी व पदाधिकाऱ्‍यांनी केली.
वर्षभरापूर्वी करण्यात आलेले रस्ते किमान दोन वर्षे करण्यात येऊ नयेत. या निधीमध्ये १५ टक्के निधी नगर पालिकेने द्यायचा आहे. त्याऐवजी शीळ धरणावर कोट्यवधीचा निधी खर्च झाल्यास साठवण क्षमता वाढेल. या वेळी राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुझा यांनी सांगितले, सर्वच पक्षाच्या माजी नगरसेवकांनी सांगितलेली कामे झाली पाहिजेत. प्रत्येकजण वैयक्तिक कामे घेऊन येत नाहीत, नागरिकांचेच प्रश्न सोडवण्यासाठी येत असतात. त्यामुळे सर्वांकडेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्‍यांनी लक्ष द्यावे, कर्मचाऱ्‍यांनी दबाव झुगारून काम करावे. महाविकास आघाडीकडून सुचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यास नगर पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही मुर्तुझा यांनी दिला.


महाविकास आघाडी शहरात सक्रिय
ठाकरे गटाचे उपनेते व आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल व्यंकटेश येथे ठाकरे गट व राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्‍यांची बैठक झाली. बैठकीत शहरातील प्रश्न आणि विकासकामांबाबत निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात यापुढे एकत्रित लढा उभारायचा निर्णय घेण्यात आला. त्याचा प्रत्यय दोन दिवसांतच आला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्‍यांनी पालिकेवर धडक देत भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com