
खेड-खेडमध्ये पाणीटंचाई संकट गडद
खेडमध्ये पाणीटंचाई संकट गडद
२३ गावे तहानलेली ; प्रशासनाची कसरत
खेड, ता. ३० ः तालुक्यात उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत तळ गाठत असल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद बनत चालले आहे. सद्यःस्थितीत २३ गावे ५८ वाड्या तहानलेल्या असून, तब्बल ७ हजार ९६८ ग्रामस्थ तहानलेले आहेत. सर्वाधिक ग्रामस्थांची संख्या कोंडिवली येथील असून ६ वाड्यांतील १०४० ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. एक शासकीय व तीन खासगी टँकरद्वारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करताना प्रशासन अक्षरश: जेरीसच आले आहे.
तालुक्यात टंचाईग्रस्त वाड्यांना अर्धशतक ओलांडत टंचाई आराखड्यात विक्रम प्रस्थापित केलेला असतानाच तहानलेल्या ग्रामस्थांच्या वाढत्या आकडेवारीनेही नवा विक्रम नोंदला गेला आहे. प्रशासनाकडून तहानलेल्या गाव-वाड्यांना एक शासकीय व तीन खासगी टँकरद्वारे २३ गावे ५८ वाड्यांना एकदिवसाआड पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जेमतेम पाण्यावर तहान भागवायची कशी, असा यक्षप्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.
--