
सरकारकडून ग्राहकांना वाढीव बिले
06194
हरी खोबरेकर
सरकारकडून ग्राहकांना वाढीव बिले
हरी खोबरेकर ः ...अन्यथा जनता धडा शिकवेल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ ः आज महावितरणच्या अनेक समस्यांनी ग्राहक ग्रासले असताना नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या भाजप शिंदे सरकारकडून वाढीव वीज बिले ग्राहकांच्या माथी मारली गेली आहेत. याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. वीज बिलांचे वाढीव दर तात्काळ मागे घ्यावेत; अन्यथा जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला.
महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने १ एप्रिल २०२३ पासून नवीन दर लागू केले आहेत. यानुसार महावितरणने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २.९ टक्के आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५.६ टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत निवासी विजेच्या दरात ६ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये औद्योगिक वीज दर १ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४ टक्के वाढले आहेत. या दरवाढीवरून खोबरेकर यांनी भाजपा सरकारवर टिका केली आहे. विरोधात असताना सरसकट वीज बील माफ करण्याची मागणी करणाऱ्या भाजपा पक्षाची दुटप्पी भूमिका या निमित्ताने दिसून आली आहे. एकीकडे महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्यात अपयश आले आहे. आज पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे ग्राहक, हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यांना सुरळीत विज पुरवठा शासन उपलब्ध करून देऊ शकत नाही. असे असताना वाढीव विज बिले ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. याचा शिवसेना ठाकरे गट निषेध करीत असल्याचे श्री. खोबरेकर यांनी म्हटले आहे.